बारामती,जळोची.- निवडणूक आयोगा पाठोपाठ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्याच गटाचे असल्याचे सांगत आज पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले यावेळी सुप्रिया सुळे योगायोगाने बारामतीत होत्या त्यांनी यावर प्रतिक्रिया देत राहुल नार्वेकरांवर शरसंधान साधलं.
त्या म्हणाल्या, मला या निकालाचे आश्चर्य वाटले नाही, कारण कॉपी-पेस्ट काम चाललेले आहे. शिवसेनेचा निकाल जो आला, त्यानंतर फक्त त्याचे नाव बदलून राष्ट्रवादी काँग्रेसचे टाकलेले आहे. त्यापेक्षा वेगळे काही नाही. राहुल नार्वेकर हे वकील आहेत, त्यांचेही अंतर्मन सांगत असेल, परंतु महाशक्तीच्या दबावापुढे ते काही करू शकत नाहीत, अशीच परिस्थिती दिसते.
या अन्यायाची आम्हाला सवय झाली असून आम्ही या संदर्भात न्यायालयात गेलेलो आहोत. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून विश्व निर्माण करून हे पक्ष स्थापन केले आहेत, पण थेट पक्ष ओरबाडून इतरांच्या हातात देण्याचे काम असंविधानिक पद्धतीने झालेले आहे. हे पाप आणि षडयंत्र अदृश्य शक्तीने केले. ही अदृश्य शक्ती देशात आज काहीही करते. ज्या मराठी माणसाने स्वतः पक्ष काढले, बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांनी शून्यातून त्यांचे विश्व उभे केले. मेहनतीने आणि महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आशीर्वाद दिला. शून्यातून हे दोघेही नेते मोठे झाले, पण या दोघांचेही पक्ष ओरबाडून आदर्श शक्ती हे काम करत आहे. आम्ही पूर्ण ताकदीने या विरोधात लढू आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आमदार राहुल कुल आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, राहुल कुल आणि त्यांचे नात्याचेही संबंध आहेत. तसेच ही लोकशाही आहे. तिथे कोणीही कोणालाही भेटू शकते. त्यामध्ये काहीही वावगे नाही.