पुणे – पुणेकरांनी तयार केलेल्या करोनाच्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी दावा करू नये असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पदवीधर मतदार संघातील एका प्रचार मेळाव्यात बोलताना त्यांनी या संबंधात विधाने केली. त्यांच्या या विधानांचे सोशल मिडीयात जोरदार पडसाद उमटले.
त्या म्हणाल्या की, लसीसाठी जग हिंडून झाले पण शेवटी लसीसाठी आमच्या पुण्यातच यावं लागले. दुनिया घुमलो, हमारे पुणे के आगे कुछ नही असा टोमणाही त्यांनी मारला. ही लस पुणेकरांनी शोधली आहे आणि त्यांनी तयार केली आहे, नाही तर कोणीतरी म्हणायचे मीच शोधली आहे!. त्यामुळे बाहेरून येऊन या लसीवर क्लेम केला तर गैसमज नसावेत असेही सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याजवळील सीरम इन्स्टिट्युट येथे करोना लसीच्या संबंधातील कामकाजाची माहिती घेण्यासाठी आले होते. सीरम इन्स्टिट्युटचे पुनावाला कुटुंबिय शरद पवारांच्या व्यक्तीगत संबंधातील आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या विधानांना महत्व आहे.
या मेळाव्यात बोलताना सुप्रियांनी भाजपवर अन्यही राजकीय टीकाटिप्पणी केली. त्या म्हणाल्या की त्यांनी आता ईडीचा वापर सुरू केला आहे. पण ते आपल्यासाठी चांगलेच आहे. कारण ईडीचा पायगुण आपल्यासाठी चांगला ठरला. विधानसभा निवडणूक काळात त्यांनी पवार साहेबांना ईडीची नोटीस पाठवली. त्यामुळे चित्र पालटलं.
आता शिवसेनेवर ईडी आली आहे. त्यांचा आधीच मुख्यमंत्री झाला आहे आता त्यांना आणखी काही तरी चांगला लाभ होणार याचाच हा संकेत आहे असेही त्यांनी म्हटले आहे. आघाडीचे सरकार आत्तापडेल, मग पडेल अशी वाट बघणाऱ्यांना पाच वर्ष कधी गेली हे कळणारही नाही त्यानंतर 25 वर्षही अशीच जातील असे नमूद करीत त्यांनी सरकार पडणार असल्याच्या दाव्याचीही खिल्ली उडवली.