पुणे – ‘मुख्यमंत्री दसरा मेळावा तसेच मुलाखतीमध्ये विरोधकांना बघून घेऊ, अशी भाषा वापरत आहेत. मुख्यमंत्र्यांना धमकीची भाषा शोभत नाही. वारंवार काय धमक्या देता, कारवाई करून पहा,’ अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री आव्हान दिले. तसेच राज्यात “ऍक्शन-रिऍक्शन’चा खेळ सुरू असून, त्याबाबत सर्वच पक्षांनी एकत्र बसून आचारसंहिता ठरविण्याची गरज असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपतर्फे राज्यभरात सरकारच्या कारभाराविरोधात पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. त्याअंतर्गत पुण्यात रविवारी ते बोलत होते. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, “अनैसर्गिकपणे सत्तेत आलेले महाविकास आघाडी सरकार वर्षभरातच पूर्णपणे गोंधळलेले आणि अपयशी ठरले आहे. त्यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला गेला आहे. वर्षभर खुर्चीसाठी धडपड, त्यासाठी वाट्टेल तो अपमान सहन करायचा, सकाळी भांडायचे, मग भाजप पुन्हा सत्तेत येईल म्हणून संध्याकाळी सामोपचाराने एकत्र यायचे, अशा पद्धतीने सरकार चालविले जात आहे.
करोना काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, अधिवेशनात या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले जातील. म्हणूनच सरकारमध्ये अधिवेशनाला सामोरे जाण्याची हिंमत नाही.’