बारामती, {प्रमोद ठोंबरे} – देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे. गेल्या सहा महिन्यांत बारामतीचे होम गाऊंड ढवळून निघाले आहे.
गट- तटाच्या राजकारणात राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ल्याला तडे गेले आहेत. यात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांची कागदावरची बेरीज सरस दिसत आहे. तरी ही लढत सध्या अटीतटीवर येऊन ठेपली आहे. दरम्यान, महायुतीच्या वाढलेल्या मताधिक्याची पडझड रोखली असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी काकांशी फारकत घेऊन महायुतीचा रस्ता धरला. त्यानंतर बारामती लोकसभेतील समीकरणे बदलून गेली आहेत. अजित पवार यांनी महायुतीत सहभागी होताना बारामती, इंदापूर, दौंडचे शिलेदार हे त्यांच्यासमवेत गेले आहेत.
त्यामुळे बारामती, इंदापूर, दौंडची राजकीय ताकद ही सुनेत्रा पवार यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत. तीन तालुक्यांत सुनेत्रा पवार यांच्यासाठी महायुतीतील मातब्बर नेत्यांची फौज आहे. यात अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, आमदार राहुल कुल, हर्षवर्धन पाटील, आमदार भीमराव तापकीर यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा संच आहे. ही बेरीज सुनेत्रा पवार यांच्या खात्यात दिसत आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून बारामतीच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. बारामतीतील भावनिक पत्र, महारोजगार मेळावा, व्यापारी मेळावा, श्रीनिवास पवार यांचे वक्तव्य आदी घटना घडल्या आहेत. यातच बारामतीच्या मेळाव्यातून शरद पवार यांनी संपूर्ण फोकस आपल्याकडे वळविला होता.
२०१४ मध्ये मोदी लाटेत खासदार सुप्रिया सुळे यांना निसटता विजय मिळाला होता. त्यानंतर सुळे यांनी पाच वर्षांत संपूर्ण सहा तालुके पिंजून काढून सर्वसामान्यांशी कनेक्ट झाले. २०१९ मध्ये खासदार सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यातील लढतीत सुळे यांनी सरशी केली. तरी भाजपाच्या खात्यात पाच लाखांवर मतांची बेरीज आहे. यात दीड लाखांच्या फरकाने कुल या पराभूत झाल्या होत्या. यात अजित पवार यांना महायुतीत सामील केल्यानंतर भाजपने बी फॉर बारामती, असा प्रचार सुरू केला आहे.
सुळेंसाठी सर्वसामान्य घटक केंद्रस्थानी
खासदार सुळे यांनी तीन टर्ममध्ये संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यातच सर्व घटकांतील सहभाग हाच त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. सुनेत्रा पवार या राजकीय समीकरणात बेरजेत दिसत आहेत. तरी सर्वसामान्य मतदार हा शरद पवार यांना मानणारा आहे. यातूनच आता खरी कसोटी महायुतीची आहे. सुळे यांनी तीन टर्म पूर्ण केल्याने बारामती लोकसभा मतदारसंघात नेटवर्क उभा केले आहे. शरद पवार यांची सहानुभूती सुळे यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.
पडझड रोखली
सहा महिन्यांत शरद पवार यांनी बारामती, दौंड, इंदापूर, भोर, पुरंदर, खडकवासला विधानसभा मतदारसंघात पडझड रोखली आहे. यातून शरद पवार यांनी सहा तालुक्यांत मतांची घटती आकडेवारी रोखण्यासाठी व्यूहरचना केली आहे.
यात गेल्या दोन महिन्यांत ढासळलेल्या बुरूंजांची डागडुजी केली आहे. सध्या दीड लाख मतांची तफावत भरून काढण्याचे आव्हान हे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी आहे. तसेच कॉंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, वंचित आघाडीच्या मतांची बेरीज ही सुळे यांच्यासाठी जमाखर्चात आहेत.