नवी दिल्ली – लोकसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरू होण्याच्या अगदी तोंडावरच तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक का केली असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने आजच्या सुनावणीच्या वेळी ईडीला विचारला. केजरीवालांच्या अटकेच्या प्रकरणावरून न्यायालयात सुनावणी सुरू असून आता ईडीकडून शुक्रवारी याबाबत उत्तर दिले जाणार आहे. (‘Why was Arvind Kejriwal arrested before polls?’ Supreme Court asks ED to reply)
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या संबंधांतील प्रकरणात आम्हाला सामग्री मिळाली असल्याचा दावा तपास संस्थेने केला आहे. मात्र केजरीवाल यांच्याबाबत काही हाती लागल्याचे त्यांनी म्हटलेले नाही. जर तपास संस्थांकडे काही असेल तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावे. त्याचवेळी केजरीवाल यांच्या अटकेच्या वेळेबाबतही प्रश्न न्यायालयाने केला आणि त्याचे उत्तर पुढच्या सुनावणीच्या वेळी म्हणजे शुक्रवारी द्यावे असे निर्देश दिले.
दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनि लॉंडरिंग प्रकरणात करण्यात आलेल्या अटकेला केजरीवाल यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. न्या. संजीव खन्ना आणि न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. कोणाचेही जिवन आणि स्वातंत्र्य फार महत्वाचे असते. तुम्ही ते नाकारू शकत नाही असे नमूद करत न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसीटर एस. व्ही. राजू यांना अन्य प्रश्नही विचारले.