Sharad Pawar On Narendra Modi । देशातील लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरु आहे. काल मोदींनी दिवसभरात ३ सभा घेतल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काल पुण्यातील वानवडी येथील रेसकोर्सच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली.
या सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी नाव न घेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अतृप्त आत्मा असा उल्लेख करत मोदींनी पवारांवर निशाणा साधला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील व्यासपीठावर होते.
दरम्यान, आता शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या या टीकेचा चांगलाच समाचार घेतला आहे. आज शरद पवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शिरुर लोकसभा मतदारसंघात आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिल आहे.
मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा केला होता. याच मुद्द्यावरून पवारांनी मोदींना घेरले. जनतेच्या प्रश्नासाठी मी भटकतच राहील, असं उत्तर पवार यांनी दिलं.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “देशाचे पंतप्रधान मोदी यांचा हल्ली माझ्यावर फार राग आहे. एकेकाळी त्यांनी भाषण केलं होतं, मी शरद पवारांच्या बोटाला धरुन राजकारणात आलो. मात्र, आता ते बोलत आहेत की, महाराष्ट्रात एक भटकती आत्मा आहे, ती अस्वस्थ आहे.
हा अस्वस्थ आत्मा गेली 45 वर्षे महाराष्ट्राचं राजकारण अस्थिर करत आहे. तो सरकार अडचणीत आणतो, असे मोदी म्हणतात. माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. पण तो स्वत:च्या स्वार्थासाठी अस्वस्थ नाही, तर लोकांच्या दु:खासाठी अस्वस्थ आहे.
शेतकऱ्यांची दु:ख पाहून आत्मा अस्वस्थ होत असेल तर त्यामध्ये काही गैर नाही. सध्या संबंध देशातील लोक महागाईने त्रस्त आहेत. त्यांना प्रपंच करणे अवघड झाले आहे. त्यासाठी मी 100 वेळा अस्वस्थ होईन, अशा शब्दांत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते मंगळवारी अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले, होते….. । Sharad Pawar On Narendra Modi
काल पुण्यातील सभेत शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या हल्लाबोल करत नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, “ज्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत त्यांचे आत्मे भटकत राहतात. ४५ वर्षांपूर्वी आपल्या महत्वकांक्षापोटी अस्थिर करण्याच्या खेळाची सुरूवात केली.
तेव्हापासून महाराष्ट्रात अस्थिरता आली. त्यानंतर राज्यातील अनेक मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळही पूर्ण करू शकले नाहीत. ते विरोधकांसोबत त्यांच्या पार्टीला आणि त्यांच्या परिवाराला अस्थिर करत आहेत.
१९९५ साली भाजप-शिवसेना युतीची सत्ता आल्यानंतर त्यावेळीही तो आत्मा त्या सरकारला अस्थिर करत होता. आता फक्त राज्याला नाही तर देशाला अस्थिर करण्याचे काम हा आत्मा करत आहे,” अशी टीका मोदींनी शरद पवारांचे नाव न घेता केली.