T20 World Cup 2024 , Team India : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने T20 विश्वचषक 2024 साठी संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात हार्दिक पांड्याला महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. पंड्या आयपीएल 2024 मध्ये खराब कामगिरीचा सामना करत आहे. मात्र, असे असतानाही बीसीसीआयने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. पांड्याला त्याच्या कामगिरीमुळे खूप ट्रोलही करण्यात आले होते.
पंड्या आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असून तो संघाचा कर्णधारही आहे. पण हार्दिकला फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही विशेष काही करता आलेले नाही. त्याने 9 सामन्यात 197 धावा केल्या आहेत. यासोबतच 4 विकेट्स घेतल्या आहेत. अशा स्थितीत हार्दिकला डच्चू दिला जाण्याची शक्यता होती. मात्र निवड समितीने त्याचा अनुभव आणि जुन्या रेकॉर्डला प्राधान्य दिले आहे. हार्दिकला केवळ मुख्य संघात स्थान मिळाले नाही तर त्याला भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. यावरून हार्दिकचा दीर्घकालीन विचार केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पांड्यापूर्वी रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. मात्र आता त्याच्या जागी हार्दिककडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या कारणावरून पांड्यालाही खूप ट्रोल करण्यात आले होते. त्याच्या खराब कामगिरीनंतरही बीसीसीआयने विश्वास व्यक्त केला.
पांड्याला टीम इंडियात स्थान का मिळाले?
पांड्याला T20 विश्वचषक 2024 च्या संघात स्थान मिळण्याची अनेक कारणे आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा दमदार कामगिरी केली आहे. पंड्या अनुभवी असून त्याने आयसीसी स्पर्धांमध्ये टीम इंडियासाठी मॅच विनिंग कामगिरी केली आहे. त्यामुळेच मंडळाने त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आहे आणि 2024 च्या टी20 विश्वचषकासाठी पांड्याला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
तसेच पांड्या याआधी गुजरात टायटन्सचा कर्णधार होता. हार्दिक पांड्याने 2022 मध्ये गुजरात टायटन्सला पदार्पणाच्या हंगामात विजेतेपद पटकावून दिलं होतं. इतकंच नाही तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातने 2023 च्या फायनलमध्येही धडक मारली होती. मात्र त्यांना चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला.
T20 World Cup 2024 : केएल राहुलला टीम इंडियात नाही मिळाली जागा..! जाणून घ्या, काय आहे मुख्य कारण…
पंड्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम….
हार्दिकने टी-20 फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी केली आहे. त्याने टीम इंडियासाठी 92 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1 हजार 348 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 3 अर्धशतके झळकावली आहेत. पांड्याने या फॉरमॅटमध्ये 73 विकेट्सही घेतल्या आहेत. 4 विकेट आणि 16 धावा ही त्याची सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी आहे. पंड्याचा वनडे फॉरमॅटमध्येही चांगला रेकॉर्ड आहे.