नगर – करोना महामारीच्या संकटकाळात सर्वसामान्य कर्जदारांची बॅंक, पतसंस्था, फायनान्स कंपनीकडून सुरु असलेली कर्जाची वसुली थांबावी, रिक्षाचालकांना मानधन मिळावे, विलगीकरण कक्षात वैद्यकिय अधिकारी डॉ. वसंत जमधडे यांचा मानसिक व शारीरिक छळ तसेच मागासवर्गीय युवकांवर झालेल्या अत्याचारासंबंधी न्याय मिळण्याची मागणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ कापसे, अजय साळवे, संजय बोरगे, अशोक लोंढे, किरण खंडागळे, अविनाश साळवे आदि उपस्थित होते. लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार बुडाला. अनेकांची रोजगाराची साधने बंद झाली. छोट्या व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्याची अडचण निर्माण झाली आहे.
या संकटाच्या काळात विचार करून व्यवहार सुरळीत होत नाही तो पर्यंत बॅंक, पतसंस्था, फायनान्स कंपनी यांच्याकडून कर्जाची वसुली थांबवावी. त्याचप्रमाणे रिक्षाचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना किमान 10 हजार रुपये मानधन सरकारने द्यावे. श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंत जमधडे यांनी करोनाचे संक्रमण रोखण्यासाठी योगदान दिले आहे. जिल्हा रुग्णालयात त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. यावेळी त्यांना वाईट वागणुक देण्यात असून, त्यांना न्याय मिळावा, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे.