मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकारमधल्या नेत्यांवर सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई होत आहे. दरम्यान, सत्ताधाऱ्यांकडून या कारवाईसाठी भाजपाला जबाबदार धरण्यात येत आहे. या कारवायांप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत सातत्याने टीका करत असतात. आजही त्यांनी याच कारवायांवरून भाजपावर खोचक शब्दात टीका केली.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांसाठी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपाला जबाबदार धरले आहे. महाराष्ट्रातल्या जनतेवर भाजपा पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. थोडे जरी पैसे खर्च केले तरी भाजप लगेच ईडीला कळवेल, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
भाजपा आणि ईडी कारवाईसंदर्भात भाष्य करताना संजय राऊत म्हणाले,”पैसे महाराष्ट्रात जपून खर्च करा. तुम्ही भाजी जरी खरेदी केलीत तरी तुमच्यावर भाजपाचं लक्ष आहे. तुम्ही चिकन खरेदी करायला गेलात तरी तुम्ही किती किलो चिकन घेतलंत, काल किती घेतलं, आज किती घेतलं यावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे, ते लगेच ईडीला कळवतील त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायला हवं”.
अजानच्या भोंग्यांवरूनही त्यांनी मनसे आणि भाजपावर टीका केली आहे. ते म्हणाले,”राज्य सरकारचे आदेश असूनही अनेक राज्यांमध्ये अजानवरचे भोंगे उतरलेले नाहीत. त्यात भाजपाशासित राज्यांचं प्रमाणही जास्त आहे. मी गोव्यात होतो, तिथेही मी अनेकदा अजान ऐकायचो, उत्तर प्रदेशातले भोंगे तसेच आहेत. काल महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यांचं पालन व्हायला हवं”.