किशोर ढोरे
कामशेत -सोमाटणे फाटा येथे होत असलेल्या अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दररोज कुणाला ना कुणाला रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. काहींना तर आपल्या जीवाला सुद्धा मुकावे लागत आहे. त्यामुळे सोमाटणे येथील चौक हा मृत्यूचा सापळा बनला आहे. या चौकात असलेले सिग्नल म्हणजे असून खोळंबा, नसून अडचण अशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
सोमटणे फाटा येथे लवकरात लवकर अद्ययावत सिग्नल यंत्रणा बसविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. या मार्गावर पुढे द्रुतगती मार्ग असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांची सारखी रेलचेल असते. त्यामुळे या चौकात सिग्नलची नितांत गरज आहे. सोमाटणे फाटा हा परंदवाडी, धामणे, बेबेडहोळ, शिरगाव, दारूंब्रे, साळुंब्रे, गहुंजे, सांगवडे, गोडुंब्रे आदी गावांना जोडणारा एकमेव मार्ग असल्याने या चौकात नेहमी वाहनांची आणि नागरिकांची वर्दळ असते.
जर या वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी कायम वाहतूक पोलीस कर्मचारी असेल तर वाहनचालकांवर वचक राहील. अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल. तळेगावहून सोमाटणे फाट्याकडे येताना तीव्र उतार आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारी वाहने नेहमी वेगाने येत असतात. काही वेळा ब्रेक न लागून चालकाचा गाडीवरील ताबा सुटतो आणि अपघात होतो. नुकतेच एका अपघातात सोमाटणे येथील वीज कर्मचारी बोरसे यांना अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला. शिवाय मागील पाच सहा दिवसांपूर्वी एक तरुणी उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडून मृत्युमुखी पडली. शिवाय या मार्गावर बऱ्याच जणांना अपघात होऊन दवाखान्यात दाखल करण्याची वेळ आली आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व पत्करावे लागले आहे.
सोमाटणे येथून शिरगावच्या दिशेने वळताना वेग कमी करावा लागतो. परंतु खिंडीतील तीव्र उतारामुळे मागील वाहनचालकास वेगावर नियंत्रण ठेवता न आल्याने समोरील वाहनावर जाऊन धडकल्याने अनेकदा अपघात झाले आहेत. उसाचे भरलेले ट्रक, डंपर आदींमुळे लहान वाहनचालकास जीव मुठीत घेऊन वाहने चालावे लागत आहे. शिरगाव ते संत तुकाराम साखर कारखाना या रस्त्यावर कारखाना सुरु झाल्यावर मोठ्या प्रमाणावर वाणांची वर्दळ असते. तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये सतत बिघाड होत असल्याने वाहनचालकास थांबायचे की जायचे कळत नाही. सोमाटणे फाट्यावर लोकवस्ती सातत्याने वाढत चालली असून, या चौकात सातत्याने गर्दी दिसून येत आहे.
उड्डाणपुलाची आवश्यकता
तळेगाव एमआयडीसी व हिंजवडी एमआयडीसी यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर सोमाटणे फाटा आहे. शिरगाव मार्गे हिंजवडीकडे जाणारी वाहने देखील याच चौकातून ये-जा करतात. सतत गजबजलेल्या या चौकात नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे येथील अपघात व वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी येथे उड्डाणपूल उभारण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. तसेच अपघात टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी सोमाटणे आणि परिसरातील नागरिकांकडून होत आहे.