भारतीय चित्रपटसृष्टीतील विख्यात चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे आज पुण्यस्मरण. त्यांचा जन्म मुंबईतील एका गुजराती कुटुंबात 26 फेब्रुवारी 1937 रोजी झाला. त्यांचे वडील किकूभाई देसाई हेसुद्धा चित्रपटनिर्माते होते तसेच पॅरामाउंट स्टुडिओचे मालक होते. मनमोहन यांचे वडीलबंधू सुभाष देसाई हेही चित्रपटनिर्माते होते. चित्रपटाचे वातावरण त्यांच्या घरातच असल्यामुळे त्यांना या क्षेत्रातील कामाचा परिचय होता. त्यामुळे वयाच्या 23व्या वर्षीच ते दिग्दर्शक बनले होते.
वर्ष 1957 मधे त्यानी बंधू सुभाष देसाईंच्या महिपाल व निरुपमा रॉय या कलाकरांबरोबर “जनम जनमके फेरे’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. मात्र त्यांनी वर्ष 1960 मधे सुभाष देसाई यांचा “छलिया’ चित्रपट दिग्दर्शित केला आणि त्यांच्या यशाची खरी वाटचाल सुरू झाली. भारताच्या फाळणीची पार्श्वभूमी असलेला छलिया हा गंभीर चित्रपट होता. त्यात राजकपूर, नूतन, प्राण आणि रेहमान यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर या जोडीने ब्लफ मास्टर, धरमवीर, देशप्रेमी यांसारखे चित्रपट केले. शम्मी कपूर आणि सायरा बानो यांची भूमिका असलेला 1963 मध्ये प्रदर्शित झालेला “ब्लफ मास्टर’ हा चित्रपट हलकाफुलका होता, तर त्यानंतरचा बद्तमीज हा शम्मी कपूर आणि साधना यांना घेऊन केलेला चित्रपट निर्माते जगदीश वर्मा यांच्यासाठी दिग्दर्शित केला होता.
1970 साली प्रदर्शित झालेल्या राजेश खन्ना यांची दुहेरी भूमिका असलेल्या “सच्च्या झूठा’ या चित्रपटामुळे मनमोहन देसाई यांना मोठे यश मिळाले. त्यानंतरचे आ गले लग जा, भाई हो तो ऐसा, रामपूर का लक्ष्मण, रोटी हे चित्रपटही व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरले आणि मनमोहन देसाई हे नाव हमखास चालणारे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाऊ लागले. मनमोहन देसाई यांनी दिग्दर्शित केलेला व त्यांचीच पहिली निर्मिती असलेला वर्ष 1977 मधे प्रदर्शित झालेला “अमर अकबर अँथनी’ हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. या चित्रपटावर अनेक स्तुतीपर लेख तसेच अनेक पुस्तकेही लिहिली गेली.
यशस्वी चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले मनमोहन देसाई एकाचवेळी चार चित्रपटांचे दिग्दर्शन करत होते. परवरीश, धरमवीर, चाचा भतीजा आणि चौथा चित्रपट होता अमर अकबर अँथनी. हे चारही चित्रपट बॉक्सऑफिसवर यशस्वी ठरले होते. त्यात अमर अकबर अँथनीने इतिहास घडविला. निर्माता म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर मनमोहन देसाई आणि अमिताभ बच्चन ही जोडी यशस्वी जोडी म्हणून प्रसिद्ध झाली. त्यांचा “कुली’ हा चित्रपट खूप गाजला, तो या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे. संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये जणू हाहाकार उडाला.
पुढे बच्चन बरे झाले आणि चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटानंतर मनमोहन देसाई यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागली. मनमोहन देसाई यांनी सलीम-जावेद, प्रयाग राज, के. के. शुक्ला आणि कादर खान या लेखकांसोबत आणि आनंद बक्षी, साहिर लुधियानवी, कमर जलालाबादी, गुलशन बावरा आणि शैलेंद्र यांसारख्या गीतकारांसोबत काम केले. तसेच राहुल देव बर्मन, कल्याणजी आनंदजी, नंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल या संगीतकारांबरोबरही काम केले. मनमोहन देसाई यांनी त्यांच्या 29 वर्षांच्या कारकिर्दीत 20 चित्रपट दिग्दर्शित केले. 1 मार्च 1994 रोजी त्यांचे घराच्या बाल्कनीतून पडून अपघाती निधन झाले.
माधव विद्वांस