नवी दिल्ली : ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या १४ श्री सेवकांच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना संजय राऊतांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली होती. श्रीसेवकाच्या मृत्यूचा आकडा ५०च्यावर गेला असून श्रीसेवकांना पैसे देऊनगप्प बसवले जात असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. दरम्यान, या आरोपांनंतर आता शिंदे गट चांगलेच आक्रमक आले आहेत. त्यानुसार षीने गटाकडून संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी यासंदर्भात माहिती दिली. याविषयी बोलताना, “संजय राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन फालतूची बडबड करत असतात. गुरुवारी सकाळीही त्यांनी पत्रकार परिषद घेऊन खारघरमधील घटनेबाबत चुकीची माहिती दिली. या घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, याचं दु:ख सर्वांनाच आहे. मात्र, या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहेत. त्यांनी ५० लोकांना मृत्यू झाल्याची चुकीची माहिती दिली. तसेच त्यांनी श्रीसेवकांना पैस देऊन शांत केल्या जात असल्याचा आरोपही केला. त्यामुळे आम्ही आज संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल केली आहे”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
“श्रीसेवकांची व्याख्या अजून संजय राऊतांना माहिती नाही. श्रीसेवक हे स्वत:चे पैसे खर्च करून निस्वार्थ भावाने समाजाची सेवा करतात. अशा श्रीसेवकांवर आरोप करणं, चुकीचं आहे. या घटनेबाबत बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही माझ्या परिवारातील सदस्य गेल्याचं दु:खं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तरीही संजय राऊतांकडून असे आरोप केले जात आहेत”, असेही ते म्हणाले.
दरम्यान, संजय राऊतांनी श्रीसेवकांच्या मृत्यू प्रकरणावरून शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला होता. “खारघर येथे श्रीसेवकांचा पाण्याशिवाय तडफडून मृत्यू झाला. काही कायकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा ५०च्यावर गेला आहे. मात्र, सरकार हा आकडा लपवते आहे. असा आरोप त्यांनी केला होता.