मुंबई – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “आमच्या हातात सत्ता द्या, लगेच आरक्षण देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग आता त्यांच्या हातात नऊ महिन्यांपासून सत्ता आहे. पण सीमाप्रश्नापासून ते मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल मनासारखा लागत नाही. याचं कारण काय? यावर तुमची दातखिळी का बसली?”
“इतर सर्व विषयातील निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात. मग महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा निकाल आपल्या मनासारखा का लागत नाही? आमच्या हातातून धनुष्यबाण चिन्हा काढून घेताना तुमच्या हालचाली बरोबर असतात, मग मराठा आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही कुठं कमी पडला? हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगितले पाहिजे,” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंबंधित पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, पुन्हा याचिका दाखल करण्याची वेळ आली, तर पुन्हा याचिका दाखल करू. पुनर्विचार याचिका मान्य होण्याची शक्यता कमी असते. पण भोसले समितीने ज्या काही सूचना केल्या आहेत, त्यावर राज्य सरकार काम करत आहे. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण मिळावं, म्हणून समितीकडून केलेल्या सूचनांची पूर्तता सरकार करेल. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.