शिवेंद्रराजेंच्या बालेकिल्ल्यातच घड्याळाची टिकटिक सुरू राहणार?
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची पक्षनिष्ठा?
नगरपंचायतीत असलेले राष्ट्रवादीचे सात नगरसेवक शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या समर्थकांनी शिवेंद्रराजेंना पाठिंबा जाहीर केला होता. मात्र, आपले पद राष्ट्रवादीमुळे आहे, याची जाणीव बहुदा त्यांना झाली असावी. कदाचित त्यामुळे पक्षनिष्ठा कायम ठेवत त्यांनी छुपा प्रचार तर केला नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. मात्र, शिवेंद्रराजेंच्या विजयापेक्षा राष्ट्रवादीला मेढ्यात झालेल्या मतदानाची चर्चा अधिक आहे.
मेढा – विधानसभा निवडणुकीत सातारा-जावळी मतदारसंघातून शिवेंद्रसिंराजे भोसले प्रचंड मताधिक्यांने विजयी झाले असले तरी मेढ्यात त्यांना मिळालेले मताधिक्य अत्यल्प आहे. मेढा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, 17 नगरसेवक, पंचायत समितीचे दोन माजी सभापती, शेकडो कार्यकर्ते, असा फौजफाटा प्रचारात उतवणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंनी येथे दोन सभा, चार कोपरा सभा आणि दोन वेळा पदयात्रा काढून पूर्ण ताकद लावली होती. त्यामुळे त्यांना मेढ्यातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना होता. प्रत्यक्षात येथे शिवेंद्रराजेंना 1225 मते मिळून अवघ्या 304 मतांचे अधिक्य मिळाले. राष्ट्रवादीच्या दीपक पवारांनी केवळ एक पदयात्रा काढून एक सभा घेतली. एकही स्थानिक नेता सोबत नसताना त्यांनी 921 मते घेऊन शिवेद्रराजेंना अचंबित केले.
सातारा-जावळी मतदारसंघात अटीतटीची झुंज होईल, असे वाटत असताना दीपक पवार हे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात थंडावलेले दिसले. मेढा ही राजेंची हक्काची व्होटबॅंक असल्याने पवारांनी शहरात फारसा जोर लावला नाही. त्याउलट त्यांनी ग्रामीण भागात ताकद लावली होती. मात्र, शरद पवारांनी सातारा येथे भरपावसात केलेले भाषण मेढेकरांनाही भावले असावे. त्यामुळे अपेक्षा नसतानाही दीपक पवारांवर 921 मते मिळाली. शिवेंद्रराजेंना जावळीतील गावागावातून मताधिक्य मिळाले असले तरी मेढेकरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नातं आहे.
गेल्या निवडणुकीतही दगडू सपकाळ यांना अशाच प्रकारे मतदान झाले होते. तेव्हा शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत होते आणि त्यांच्यापुढे शिवसेनेचे आव्हान निर्माण केले होते. मात्र, या निवडणुकीत शिवसेनाही सोबत असताना त्यांना केवळ 304 मतांचे अधिक्य मिळाले, हे पचवणे भाजप नेत्यांना जड जात आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीतील राजकीय गणिते बदलू शकतात. शहरातील मतदारांनी घड्याळाला दिलेली पसंती पाहता नगपंचायतीमधून राष्ट्रवादीचा सुफडा साफ करणे भाजपला कठीण जाणार आहे.