बारामती – भाजप-शिवसेनेत जो सत्तेचा फॉर्म्युला ठरलेला आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले याचा अर्थ 50-50 टक्के त्याचं जे काही ठरलं असेल त्या पद्धतीने होईल. मात्र, मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी त्यांच्याकडून गेल्या, शिवसेना या वेळी काही सहन करेल, असे दिसत नाही. आपला आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल, असे मला वाटते असे सूचक विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
राज्यात भारतीय जनता पक्ष 220चा आकडा पार करेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेते करीत होते. याकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या सभा घेत प्रयत्न केले. परंतु, भाजप-शिवसेना महायुतीच्या घोडदौडीला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाआघाडीने लगाम लावला. त्यात भाजपपेक्षा शिवसेनेची मोठी पिछेहाट झाली. त्या तुलनेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले. आता, भाजपकडून पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असताना शिवसेनेकडून 50-50 फॉर्म्युल्यासह अन्य अटी घातल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सूचक विधान केले आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला बरोबर घेत महाआघाडी सत्ता स्थापन करू शकेल, अशी चर्चा असतानाच शिवसेना भाजपबरोबरच सत्ता स्थापन करेल, असे विधान करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेगळ्या राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला असला तरी गेल्यावेळी सत्तेत योग्य वाटा मिळाला नव्हता. याबाबतची खंत ठाकरे यांनी वेळोवेळी बोलून दाखविली आहे. याच कारणातून मागील पाच वर्षात सत्तेत राहूनही शिवसेनेने भाजप विरोधातच भूमिका बजावल्याचे अनेकदा दिसले. याच करणातून भाजपला आता कोंडीत पकडण्याची तयारी शिवसेना करीत आहे. परंतु, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री, असा फॉर्म्युला असल्याचे (पान 7 पहा)8
पवार बोलले.., शिवसेनेचे महत्त्व झाले कमी
राज्यात भाजपबरोबर राहूनच सत्ता स्थापन करणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर करताना भाजपकडे सत्तेत पन्नास टक्के वाटा मागितला आहे. कमी जागा निवडून आलेल्या असताना शिवसेनेचा आवाज मात्र वाढला होता. परंतु, आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसही शिवसेनेसोबत जाण्याऐवजी विरोधक म्हणून बसण्यास प्राधान्य देईल, असे विधान करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शिवसेनेचे महत्त्व कमी केले आहे. यामुळे आपोआपच भाजपचे राजकीय वजन पुन्हा एकदा वाढले असून यातून शिवसेनेलाच नमते घ्यावे लागणार, अशीही स्थिती निर्माण होऊ शकते.