सातारा – सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच पुन्हा पसंती दिली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये उडी मारणारे शिवेंद्रराजे भोसले तब्बल 43 हजार 254 मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे दीपक पवार यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. शिवेंद्रसिंहराजे यांना 1,17,334 तर दीपक पवार यांना 74080 मते मिळाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे गेली पंधरा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीनंतर आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांचे कट्टर विरोधक दीपक पवार यांनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाट धरली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दीपक पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी केलेला प्रचार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्यासह नेतेमंडळींच्या सभा, पदयात्रा, घरभेटी यामुळे प्रचाराचा धुरळा उडाला.
प्रचाराचा एकंदरीत नूर पाहता ही लढत रंगतदार होईल, अशी चर्चा होत होती. मात्र, मतदानादिवशी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले. सातारा शहरात तर त्यांचे कार्यकर्ते मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्यासाठी उद्युक्त करत होते. ही लढाई शिवेंद्रसिंहराजे यांनी मोठ्या फरकाने जिंकावी यासाठी कार्यकर्त्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये कोणतीही कसर सोडली नाही. शहरातील भाजपचा पारंपरिक मतदार आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमाच्या बळावर शिवेंद्रसिंहराजे यांनीही मोठ्या फरकाने विजयाचा चौकार मारला आहे. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच शिवेंद्रराजे यांनी आघाडी घेतली होती. दरम्यान, पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिलेल्या शिवेंद्रराजे यांचा विजय पहिल्या दहा फेऱ्यांमध्येच निश्चित झाला होता.
त्यानंतरच्या सर्व फेऱ्यांमध्ये शिवेंद्रराजे यांनी मताधिक्य वाढवत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांचा हा विजय साजरा करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहरातून रॅली काढून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. त्यानंतर शिवेंद्रसिहराजे भोसले व पत्नी सौ. वेदांतिकाराजे यांनी मतमोजणी केंद्राल भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिवेंद्राजे म्हणाले, माझे मोठे बंधू उदयनराजेंच्या धक्कादायक पराभवाने मला वेदना झाल्या आहेत. त्यांच्या पराभवाची कारणमीमांसा पक्ष पातळीवरुन होणे गरजेचे आहे.