शिर्डी – काँग्रेस आता पाकिस्तानची भाषा बोलू लागला आहे. मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. जम्मू-काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आपल्याला सांगतात की, पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांना मतदान करू नका, असे आवाहन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाला टोला लगावला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून महायुतीने त्यांना लक्ष्य केले आहे. याच संदर्भात आता मुख्यमंत्री शिंदे यांनीही काँग्रेसवर टीका केली. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी श्रीरामपूर येथे जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेस पक्ष हा आता पाकिस्तानची भाषा बोलू लागला आहे. मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. फारुख अब्दुल्ला आपल्याला सांगतो पाकिस्तानने हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्यांना मतदान करू नका.
आधी आपल्या देशावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ला करायचे, आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून न्यायचे. आपले तत्कालीन पंतप्रधान संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत दाद मागायचे. मात्र आता पुलवामामध्ये लष्करावर हल्ला झाला, तेव्हा बालाकोटमध्ये घुसून त्याचा बदला घेण्यात आला. त्यामुळे आताचा नवीन भारत हा मजबूत भारत आहे, असे शिंदे म्हणाले.