श्रीनिवास पाटील 90 हजार 717 मतांनी विजयी
सातारा – राज्याचे लक्ष लागलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सभांनी गाजलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना तब्बल 90 हजार 717 मतांनी धूळ चारत हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे राखण्यात यश मिळविले. श्रीनिवास पाटील यांना सहा लाख 36 हजार 620 तर उदयनराजे भोसले यांना पाच लाख 45 हजार 903 मते मिळाली. या मतदारसंघात दहा हजार 159 मतदारांनी “नोटा’चा अधिकार बजावला.
पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढला होता. त्यामुळे मतमोजणीच्या 34 फेऱ्या आज झाल्या. अखेरच्या फेरीअखेर श्रीनिवास पाटील 90 हजार 717 मतांनी विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी श्वेता सिंघल यांनी घोषित केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीची मतमोजणी एकाच वेळी होत असल्याने पोटनिवडणुकीचा निकाल उशीरा मिळत होता. सकाळी मतमोजणी केंद्रात कार्यकर्त्यांची गर्दी होती. उदयनराजे पिछाडीवर पडत असल्याचे लक्षात आल्यावर युतीचे कार्यकर्ते निघून जाऊ लागले. विधानसभेचे निकाल लागताच आमदारासंह इतर कार्यकर्तेही बाहेर पडू लागले.
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील व उयनराजे याच्यातच मुख्य लढत झाली. वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्षांना फारशी लक्षणीय कामगिरी करता आली नाही. अपक्ष शिवाजी जाधव (भोसरेकर) यांना मिळालेली पंधरा हजार मते वगळता इतर उमेदवारांना लक्षणीय मते घेता आली नाहीत. पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले विरूध्द श्रीनिवास पाटील यांच्यातील चुरशीच्या लढतीला “कॉलर विरुद्ध मिशी’ असा राजकीय रंग देण्यात आला होता. शरद पवार यांच्या पावसातील सभेने राष्ट्रवादीला साताऱ्यात मिळालेल्या सहानूभूतीचा प्रत्यय मतमोजणीच्या वेळी आला.
येथील शासकीय वसाहतीच्या गोडाऊनमध्ये दोन स्वतंत्र दालनात सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सुरवात झाली. तत्पूर्वी दालनात उपस्थित तीन हजार 200 कर्मचाऱ्यांना
प्रत्येक फेरी जाहीर होण्यासाठी प्रचंड उशीर होत होता. निकालाचे फेरीनिहाय परिणाम येण्यासाठी अर्धा तास वेळ जात होता. विधानसभा व लोकसभा निवडणुकांची मतमोजणी एकाच वेळी एकाच ठिकाणी असल्याने प्रशासनावर प्रचंड ताण पडला होता. पांढऱ्या रंगाची खूण असणाऱ्या प्रत्येकी चौदा टेबलांवर पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सहा विधानसभा मतदारसंघांचे अंतिम निकाल जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर जाहीर करण्यात येत होते. संपूर्ण गोडाऊन परिसराला चार हजार पोलिसांचा गराडा होता. विधानसभेचे विजयी उमेदवार मतमोजणी केंद्रावर येऊन जात होते.