श्रीकांत कात्रे
शरद पवारांचा करिष्मा, पक्षाचे नेटवर्क प्रभावी, भाजपच्या फाजील आत्मविश्वासाचा फुटला फुगा
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागला आणि लोकांना गृहीत धरणाऱ्या उदयनराजेंना पराभवाला सामोरे जावे लागले. जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेटवर्क प्रभावी आहेच आणि शरद पवार यांचा करिष्माही अद्याप कायम असल्याचे या निकालाने सिद्ध केले आहे.
राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उतरून विजयी झालेल्या उदयनराजे भोसले यांनी चारच महिन्यांमध्ये खासदारकीचा राजीनामा देऊन लादलेली पोटनिवडणूक जिल्ह्यातील लोकांना रुचली नाहीच, शिवाय त्यांच्या लोकप्रियतेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत. यापूवीच्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये केवळ राष्ट्रवादीचे नेटवर्क त्यांच्याबरोबर होते, म्हणूनच ते विजयापर्यंत पोहोचत होते, ही वस्तुस्थिती आता तरी त्यांनी मान्य करावी. उदयनराजे पराभूत झाल्याचे फारसे दुःख भाजपच्या नेतृत्वाला होईलच, असे नाही. कारण “शिवछत्रपतींचे वंशज आमच्याकडे आले’ एवढा प्रचाराच्या मुद्द्यापुरता सीमित उपयोग भाजपला करून घ्यायचा होता, असे एकूणच निकालावरून वाटत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही शरद पवार यांचाच प्रभाव सातारा जिल्ह्यात अधिक असल्याचे सिद्ध झाले आहे. मोदी यांच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी शरद पवार यांच्या भरपावसात झालेल्या प्रचार सभेने लोकसभा पोटनिवडणुकीला निर्णायक कलाटणी दिली आणि निवृत्तीच्या वयात श्रीनिवास पाटील यांना पुन्हा संसदेत जाण्याची संधी मिळाली आहे. भाजपला मात्र जिल्ह्यात शिरकाव करता आला, यावरच समाधान मानावे लागणार आहे. कारण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेल्या दोन आमदारांखेरीज भाजपला जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमध्ये विजय नोंदविता आलेला नाही.
लोकसभा पोटनिवडणुकीमुळे तर भाजपचा “उसनी’ हवा भरलेला फुगा फुटला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपली इभ्रत राखली असून कॉंग्रसेने कराड दक्षिणची एकमेव जागा राखून अस्तित्व टिकवले आहे. मात्र, कोरेगाव मतदारसंघात विद्यमान आमदार शशिकांत शिंदे यांचा झालेला निसटता पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागणारा आहे. आ. शिंदे यांचा अपवाद वगळता जिल्ह्यातील एकही विद्यमान आमदार जनतेने बदललेला नाही, हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते. शिवछत्रपतींचे वंशज आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तीन वेळा विजयी झालेल्या उदयनराजे भोसले यांच्या अचानक बदलेलेल्या भूमिकेमुळे ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरली. उदयनराजे यांनी प्रत्येक निवडणुकीनंतर नेहमीच पक्षापेक्षा स्वतःच्या लोकप्रियतेवर दावा मांडला होता. त्याला आज धक्का बसला. “जनता हाच पक्ष’ असे म्हणत पक्षाला आणि नेत्यांना दुय्यम ठरविण्याचा त्यांचा नेहमीचा डाव यावेळी लोकांनीच मोडून काढला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्याचा त्यांचा निर्णय योग्य होता. कारण त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेटवर्कची ताकद माहीत होती, तरीही नंतर राजीनामा देऊन त्यांनी भाजपचा मार्ग निवडला. तो फाजील आत्मविश्वासच त्यांना नडला. उदयनराजे यांचे व्यक्तिमत्त्व वादग्रस्तच आहे. विशिष्ट पद्धतीने ते लोकांमध्ये प्रियही आहेत. कॉलर उडविणे किंवा डायलॉगबाजी करीत लोकांचे मनोरंजन करणे, एवढ्यापुरतीच ती लोकप्रियता आहे. कधीही गांभीर्याने राजकारण न करता लोकांना गृहीत धरण्याची त्यांची चूक नडलीच आहे. त्याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्यावर हा जिल्हा प्रेम करतो, याचा विसर त्यांना पडला; किंबहुना भाजपच्या भरवशावर ते राहिले.
त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आणि भाजपचा अवास्तव आत्मविश्वास त्यांना जमिनीवर आणणारा ठरला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व आमदारांचा उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध असताना शरद पवार यांनी झुकते माप देत उदयनराजे यांनाच उमेदवारी दिली होती. त्यावेळी सर्वच आमदारांनी पवारांच्या इच्छेखातर उदयनराजेंच्या पारड्यात मते टाकली म्हणून ते तिसऱ्यांदा विजयी झाले होते, हे या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध झाले.
यावेळी वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण या ठिकाणी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळालेली मते लक्षात घेतली तर या आमदारांनी उदयनराजे यांच्या विरोधातील मताधिक्य वाढविण्यास मदत केली आहे, हेच लक्षात येते. त्यांनी जोमाने विरोध करून उदयनराजेंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. निवडून आल्यावर शरद पवार यांच्याविरोधात बोलणे, “मी म्हणजेच पक्ष’ अशी भूमिका घेणे, जिल्ह्यातील आमदारांना महत्त्व न देणे, यामुळे असलेली अनेक वर्षांची खदखद व्यक्त करण्याची आयती संधी आमदारांकडे चालून आली आणि तीन वेळा खासदारकी देऊनही पक्षाच्या व नेत्यांच्या विरोधात विकासकामे न झाल्याचा दावा करीत उदयनराजेंनी शरद पवार यांना दगा दिला, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना कधीच रुचत नव्हते.
उलट सर्वांच्या मनात मोठी चीड होती. उदयनराजे भाजपमध्ये गेल्यावर ती चीड व्यक्त झाली. त्याचबरोबर यावेळी वाढलेला मतदानाचा टक्काही उदयनराजेंच्या पराभवासाठी कारणीभूत ठरला असावा. जिल्ह्यातील युवा वर्ग केवळ उदयनराजेंच्या “क्रेझी’ वागण्याचा चाहता आहे, हा भ्रम आता दूर झाला आहे. वयाच्या 79 व्या वर्षी एखाद्या तरुणाला लाजवेल, या पद्धतीने राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात प्रचाराची राळ उडवून देणाऱ्या आणि एकहाती लढा देणाऱ्या शरद पवारांचाही हा युवा वर्ग फॅन आहे, हेदेखील अधोरेखित झाले आहे.
पावसात भिजत भाषण करणाऱ्या शरद पवार यांनी कबूल केलेली चूक उदयनराजेंना महागात पडली. तीन वेळा पक्षाकडून निवडून येऊनही पक्षाच्या विरोधात भूमिका घेण्याच्या चुकांच्या वचपाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काढला. एकाकी लढणाऱ्या पवार यांना लोकांनी साथ देत त्यांची चूक माफ केली, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. त्याखेरीज स्वतःच्या ताकदीबाबत फाजील आत्मविश्वास उदयनराजेंना नडला. जनता हाच पक्ष, मीच पक्ष, ही भूमिका लोकशाहीत फार काळ चालत नसते. पक्षीय राजकारणावर अजूनही या देशातील लोकांचा विश्वास आहे आणि यापुढेही असेल, या विचारासह आता तरी लोकांमध्ये राहून लोकांसाठीच काम करणे, हेच महत्त्वाचे आहे, हे उदयनराजे यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याच वेळी आपल्याकडे सत्ता आहे, म्हणून आपण म्हणू तेच लोक करतील, असा फाजील आमविश्वास भाजपने बाळगू नये, असाही या निकालाचा अर्थ आहे.
आदर करू, पण मत नाही…
शिवछत्रपतींच्या गादीचा मान ठेवू, आदर करू; पण मत राष्ट्रवादीलाच देऊ, ही भावना रुजवण्यात शरद पवार व जिल्ह्यातील नेत्यांना यश आले. उदयनराजे यांच्या व्यक्तिगत ताकदीच्या मर्यादा या निवडणुकीने स्पष्ट केल्या आहेत. केवळ स्टंट करून लोक दीर्घकाळ फसत नाहीत. त्याचबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात उदयनराजे यांचा रामराजे नाईक निंबाळकर व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी झालेला वाद आणि खालच्या पाळीवर झालेले आरोप-प्रत्यारोप लोक विसरले नाहीत. साताऱ्यातील “मनोमीलन’ फॅक्टरवरही लोकांनी यावेळी विश्वास ठेवला नाही.
सोयीसाठी मनोमीलन आणि इतर वेळी संघर्ष, या दुटप्पी भूमिकेला कार्यकर्तेही वैतागले होते आणि जनताही त्रस्त झाली होती. दोन्ही राजे एकत्र आले आणि नाही आले तरी विकासाच्या बाबतीत सातारच्या लोकांचा भ्रमनिरास होत आला आहे. या निवडणुकीत लोकांनी एक पराभवाचा आणि एक विजयाचा कौल दिला आहे. आता साताऱ्यातील मूलभूत व पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने पाहावे लागेल, असा इशाराच लोकांनी दिला आहे.