नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सुरत न्यायालयाचा निकाल त्यांच्या विरोधात गेला आहे. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. दरम्यान, या निर्णयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हल्ला करताना “सारे काही शेटजींचे आणि शेटजी साहेबांचे,” अशा तिखट शब्दांत त्यांनी टोला लगावला.
राहुल गांधी यांनी याविषयी एक ट्विट केले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांची पंतप्रधान मोदींबरोबरील छायाचित्रे, अदानी उद्योग समुहाच्या व्यवसायांचा नकाशा वापरून बनविलेली चित्रफित त्यांनी पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, विमानतळे शेटजींची, बंदरे शेटजींची, वीज शेटजींची, कोळसा शेठजींचा, रस्ते शेटजींचे, खाणी शेठजींच्या, जमीन शेटजींची, आकाश शेटजींचे. शेटजी कोणाचे? शेटजी “साहेबां”चे ! असा टोला त्यांनी लगावला.
‘पंतप्रधान म्हणतात की सबका साथ आणि सबका विकास, पण आज देशाचे सरकार एकाच व्यक्तीसोबत उभे आहे आणि एकाच व्यक्तीचा पूर्ण विकास करते,‘ असा चिमटाही राहुल यांनी काढला आहे. अदानींच्या व्यवसायाचा २०१४च्या पूर्वीचा नकाशा दर्शवताना राहुल यांनी म्हटले आहे की, ‘व्यवसाय वाढणे चांगले आहे.
एयरपोर्ट सेठ के, पोर्ट सेठ के,
बिजली सेठ की, कोयला सेठ का,
सड़कें सेठ की, खदानें सेठ की,
ज़मीन सेठ की, आसमान सेठ कासेठ किसका? सेठ ‘साहेब’ का! pic.twitter.com/qUIRYOrtOO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2023
पण इथे तर चमत्कार झाल्याचे दिसते. वीज प्रकल्प, बंदरे, विमानतळ, सौर उर्जा, पवन उर्जा, खाण उद्योग, संरक्षण, ड्रोन, रस्तेबांधणी, सिमेंट अशा प्रत्येक ठिकाणी ‘अदानी-अदानी-अदानी… पंतप्रधानांना पुन्हा एकदा विचारतो, देशाची संपूर्ण संपत्ती एकाच व्यक्तीकडे का सोपविली जात आहे? यामागे कोणती शक्ती आहे ? हे कोण करीत आहे ? देशातील प्रत्येक तरुण, प्रत्येक नागरिक हे प्रश्न विचारत आहेत. किमान उत्तर तरी द्या! असे खोचक आव्हान राहुल यांनी केले आहे.