-पाटणमध्ये शंभूराज, कराड दक्षिणला पृथ्वीराज
-भाजपचे शिवेंद्रसिंहराजे व जयकुमार विजयी
-शशिकांत शिंदे यांचा महेश शिंदेंकडून पराभव
-वाई, कराड उत्तर, फलटणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच
सातारा – जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात चुरशीने झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने आपले वर्चस्व कायम ठेवले. भाजपमध्ये आलेले दोन आमदार विजयी झाले. शिवसेनेच्या शंभूराज देसाई यांनी पाटणची जागा कायम राखली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख नेते शशिकांत शिंदे यांना मात्र पराभूत करुन शिवसेनेचे महेश शिंदे “जायंट किलर’ ठरले आहेत. आठपैकी महेश शिंदे वगळता इतर सातही मतदारसंघात विद्यमान आमदारांनीच विजय नोंदवला आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात प्रामुख्याने या निवडणुकीत मोठा संघर्ष झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यात शिरकाव करण्यात भाजपला यश मिळाले. मात्र, भाजपच्या या दोन्ही जागा म्हणजे पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसच्याच आहेत. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांनी विजय मिळवल्यामुळे भाजपचे नाक राहिले आहे. शशिकांत शिंदे यांचा पराभव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे.
वाईतून मकरंद पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण, फलटणमधून दीपक चव्हाण यांचे विजय अपेक्षेप्रमाणे झाले आहेत. पारंपरिक संघर्ष असलेला पाटण मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात शंभूराज देसाई यांनी यश मिळवले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सत्यजित पाटणकर यांनी चांगली लढत दिली मात्र, यशापर्यंत ते पोहचू शकले नाहीत. वाईमधून मकरंद पाटील यांनी 43 हजारांहून अधिक विक्रमी मताधिक्यांनी विजय नोंदवला. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले मदन भोसले या लढतीत पराभूत झाले. मदन भोसले यांच्या प्रवेशानंतर महाबळेश्वर, खंडाळा या तालुक्यांतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे पारडे जड झाल्याची चर्चा होती.
मात्र, सतत पाच वर्षे मतदारसंघात संपर्क असलेल्या मकरंद पाटलांनी ही चर्चा फोल ठरवली. निवडणुकीपुरतेच रिंगणात येणाऱ्या मदन भोसले यांना मतदारांनी नाकारले. कोरेगावमधील निकाल सर्वात धक्कादायक मानला जातो. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते शशिकांत शिंदे यांना युवा नेतृत्व महेश शिंदे यांनी माती चारली आहे. अडीच वर्षापासून मतदारसंघ पिंजून काढत महेश शिंदे यांनी गावोगावी भाजप पोहोचवला होता. मात्र, युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेल्यामुळे महेश शिंदे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करुन ही निवडणूक लढवली होती. खटाव व कोरेगाव तालुक्यातील गावांमध्ये मिळालेल्या मताबरोबरच सातारा तालुक्यातील गावांमधील मते या निकालात निर्णायक ठरली.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कराड दक्षिणमध्ये तिरंगी लढतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विजय मिळवला. भाजपने पाच वर्षे प्रचंड पाठबळ दिलेले अतुल भोसले पराभूत झाले. विलासराव पाटील- उंडाळकर यांचे चिरंजीव उदयसिंह यांची अपक्ष उमेदवारी येथे निर्णायक ठरली. त्यामुळे जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ राखत कॉंग्रेसने आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. सातारा मतदारसंघात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपली विजयाची परंपरा कायम ठेवली आहे. या मतदारसंघातून 2004 पासून ते निवडून येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करत यावेळी त्यांनी