पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पाणीटंचाई आणि उन्हाची तीव्रता वाढल्याने मार्केट यार्डात मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक काहीशी कमी झाली आहे. त्या तुलनेत फळभाज्यांना मागणी जास्त असल्याने कांदा, शेवगा, घेवडा, मटार, फ्लॉवरच्या भावात ५ ते १० टक्के वाढ झाली आहे, तर मागणी कमी असल्याने केवळ भुईमूग शेंगांच्या भावात घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
येथील बाजारात रविवारी (दि. ५) राज्यासह परराज्यातून भाजीपाल्याची सुमारे ९० ट्रक आवक झाली. परराज्यातून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे १० ते १२ टेम्पो, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून तोतापुरी कैरी प्रत्येकी १ हजार बॉक्स, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा ४ ते ५ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार ४ ट्रक,
कर्नाटक येथून पावटा २ टेम्पो आणि बेळगाव येथून भुईमूग शेंगा २ टेम्पो, तर आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ४ ते ५ टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे ९ ते १० टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, भेंडी आणि गवार प्रत्येकी ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १०, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, भुईमूग शेंगा ५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ८० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ते ३५ टेम्पो आवक झाल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.