पुणे, {प्रभात वृत्तसेवा} : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया शुक्रवारी (दि. १०) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डातील फळ विभागात रत्नागिरी हापूसला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत आवक आणि भावात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुढील चार दिवस आंब्यांचे भाव तेजीत राहण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.
येथील बाजारात रविवारी (दि. ५) रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांतून मिळून सुमारे १० ते ११ हजार पेटी आंब्यांची आवक झाली. ती मागील आठवड्याच्या तुलनेत १० टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भावातही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बाजारात कच्च्या मालाच्या ४ ते ८ डझनाच्या पेटीला ८०० ते २५०० रुपये भाव मिळत आहे. तयार आंब्यांचा दर्जा आणि आकारानुसार ४०० ते ८०० रुपये डझन भावाने विक्री होत आहे. येत्या दोन दिवसांत आणखी मागणी वाढेल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अक्षय तृतीयेमुळे हापूसला मागणी वाढली आहे. शहरातील किरकोळ विक्रेते आणि घरगुती ग्राहकांकडून आंब्याची खरेदी होत आहे. आंब्याचे भावही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. पुढील दोन- तीन दिवसात आंब्यांना आणखी मागणी वाढेल.
अरविंद मोरे,रत्नागिरी हापूसचे व्यापारी, मार्केट यार्ड.
कर्नाटक हापूसची आवक वाढली
लोकसभा निवडणूक आणि इतर् कारणांमुळे कर्नाटक येथून होणारी हापूसची आवक घटली होती. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून कर्नाटकमधून आवक वाढली आहे. आजही (दि. ५) मोठी आवक झाली.
कर्नाटक हापूसच्या ४ ते ५ डझनाच्या ७ ते ८ हजार पेटी, तर २ डझनाच्या 2० ते २५ हजार बॉक्सची आवक झाली. हापूसच्या ४ ते ५ डझनाच्या कच्च्या मालाच्या पेटीला दर्जा आणि आकारानुसार ८०० ते १४०० रुपये भाव मिळाल्याची माहिती कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली. दरम्यान महिनाभर आवक जास्त होईल, असेही त्यांनी सांगितले.