पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका आजपर्यंत कधीच स्थिर राहिली नाही. आताही त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, याचाच अर्थ त्यांचेही हात कुठेतरी दगडाखाली अडकले आहेत का, असे वाटते, अशी टिपण्णी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ ते पुण्यात आले होते.
काँग्रेस भवन येथे वडेट्टीवार यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सहप्रभारी आशिष दुवा, माजी आमदार मोहन जोशी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, गुजरात काँग्रेस प्रवक्त्या प्रगती अहिर, प्रा. प्रकाश सोनवणे, अजित दरेकर आदी उपस्थित होते.
नारायण राणे यांच्या विरोधात प्रचार करणारे राज ठाकरे आज राणे यांच्या प्रचारार्थ कोकणात स्वत: उतरले आहेत, यावर बोलताना वडेट्टीवार यांनी उपरोक्त टिपण्णी केली, तसेच राज ठाकरे यांचे हात कुठेतरी दगडाखाली अडकले असावेत; अन्यथा राज ठाकरे खरेतर अशा जुमलेबाजांबरोबर राहणारे नाहीत, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.
राणे हे माझे नेते होते. वारंवार पक्ष बदलणे योग्य नाही. मी गेल्या १८ वर्षांपासून कॉंग्रेसमध्येच आहे. आमच्या पक्षात गद्दारी ही कायमच गाडली गेली आहे, यापुढेही गाडली जाईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.
वडेट्टीवार म्हणाले….
– महाराष्ट्रात इंडिया आघाडी ३८ जागा जिंकेल
– २०१४ मध्ये विकासाच्या नावावर, २०१९ मध्ये शहीदांच्या नावावर आणि आता रामाच्या नावावर मते मागण्याची वेळ भाजपवर आली आहे.
– पराजय दिसतो आहे म्हणूनच भाजपने मुस्लिम आणि भारत- पाकिस्तान मुद्दे प्रचारात काढले.
– दहशतवादी कसाब याला बिर्याणी खाऊ घात असल्याचे आरोप अॅड. उज्ज्वल निकम यांनी केले. खरी परिस्थिती उघडकीस आल्यावर निकम यांनी माफी मागितली. निकम खोटारडे आहेत.