कर्जत -रानडुकरांच्या हैदोसाने तालुक्यातील कोंभळी भागातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. पेरणी केलेल्या शेताची त्यांच्याकडून नासधूस होत असल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी त्यांच्याकडून होत आहे.
यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांना वेळेत पेरण्या करता आल्या. तसेच काही शेतकरी पेरण्या करीत आहेत. पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मात्र शेतकरी पेरणी करून गेल्यानंतर रात्रीच्या वेळी रानडुकरे अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. नवीन पेरणी केलेल्या शेतात येऊन ते पेरलेल्या बियाण्यांवर ताव मारत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांनी बाजरी, मूग, उडीद, मक्याची पेरणी केली आहे. बाजरी, मूग, उडीद बियाणे आकाराने लहान असल्याने ते या रानडुकरांच्या तोंडात येत नाहीत. मात्र, मक्याचे बियाणे आकाराने मोठे असल्याने या बियाण्यावर ही रानडुकरे ताव मारत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
लॉकडाऊनच्या काळात शेतमाल बाजारात कसा न्यायचा, या विवंचनेत शेतकरी होता. त्यामुळे अनेकांचा शेतीमाल शेतातच सडला. ज्यांनी जीव धोक्यात घालून हा शेतीमाल बाजारात नेला. त्यांनाही या मालाला बाजारभाव कमी असल्याने तोटाच सहन करावा लागला. हे नुकसान सहन करून शेतकऱ्यांनी पोटाला चिमटा घेऊन उधार, उसनवारी करून बियाणे खरेदीकरून पेरणी केली.
मात्र पेरणी केलेल्या बियाण्यांवर रानडुकरे फडशा पाडत असल्याने शेतकऱ्यांवर दुबारपेरणीशिवाय पर्याय उरला नाही. मात्र दुबारपेरणीसाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्नही त्यांच्यासमोर उपस्थित होत आहे. त्यामुळे वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.