वडगाव मावळ – मावळ तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमुळे राजकारण कमालीचे तापले आहे. सर्व गावांतील ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व सहकारी सोसायट्यांचे संचालक हे मतदार असल्याने त्यांचे मार्केटही चांगलेच वाढताना दिसत आहे. त्यातच ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची “लिटमस टेस्ट’ म्हणून पाहिली जाणार असल्याने या निवडणुकीत युती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. काही अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने या निवडणुकीतही इतर निवडणुकीप्रमाणे घोडेबाजार रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे मावळ तालुक्यात आजी-माजी आमदारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.
मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी येत्या 28 एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी 147 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 40 जणांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले. आता 18 जागांसाठी दोन्ही पॅनेलचे 36 उमेदवार आहेत. याशिवाय चारजण अपक्ष म्हणून असे एकूण 40 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मावळ तालुक्यातील बाजार समिती निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे.
मावळ तालुक्यात विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून विकासकामांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. लोकसभा निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची ही निवडणूक महत्वाची आहे. राजकारणातील आर्थिक नाडी समजली जाणारी कृषी उत्पन्न बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी उमेदवारांकडून भर उन्हात पायाला भिंगरी लावून गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला जात आहे. काही भेटी या गुप्त पद्धतीने गावाबाहेर घेतल्या जात असून ऐकमेकांचे मतदार फोडण्यासाठी काही जणांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. मतदारांसाठी जेवणावळीही सुरू झाल्या आहेत. वेगवेगळी प्रलोभने दिली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोसायटी आणि ग्रामपंचायत मतदार संघातील मतदारांचा “भाव’ आणखी वाढणार असल्याचे हे संकेत आहेत.
कॉंग्रेसमधील एक गट सर्वपक्षीय पॅनेलसोबत
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्यावतीने पॅनेल तयार करण्यात आले आहे. मात्र कॉंग्रेसमधील एक गट भाजपच्या सर्वपक्षीय पॅनेलसोबत गेला आहे. “”आम्ही वारंवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत पॅनेल संदर्भात संपर्क साधला होता. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही सर्वपक्षीय पॅनेलसोबत जाण्याचा निर्णय घेतला” असे कॉंग्रेसचे मावळ तालुक्यातील नेते यशवंत मोहोळ यांनी सांगितले.