मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात 17 फेब्रुवारीला अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला. आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्हही शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे.
त्याउलट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या दृष्टीने तो निर्णय अतिशय धक्कादायक आहे. स्थापनेपासून शिवसेना म्हणजेच ठाकरे असे समीकरण होते. मात्र, यापुढे शिवसेना हा शिंदेंचा पक्ष म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळेच शिवसेनेचे महत्त्वाचे निर्णय जिथे घेतले जातात त्या मातोश्री बंगल्यावरील मुख्य बैठकीच्या ठिकाणचे धनुष्यबाण हे चिन्ह काढून टाकण्यात आल्याचं दिसून आलंय.
काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी मातोश्रीवरील बैठक कक्षातील ‘शिवसेना नाव आणि धनुष्यबाण’ काढून टाकण्यात आल्याचं दिसून आलं. मातोश्रीतील हा मोठा बदल शिवसैनिकांच्या नजरेतून सुटला नाही. आणि याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले.
दरम्यान, मातोश्रीतील मुख्य कक्षातील धनुष्यबाण चिन्ह गायब झाल्याचे दृश्य पाहिल्यानंतर शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय. 1989 मध्ये शिवसेनेला अधिकृतरित्या धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं. तेव्हापासून शिवसेनेच्या राजकीय कारकीर्दीत धनुष्यबाण चिन्हाचं महत्त्व अधिक वाढत गेलं. मात्र, आता हेच चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे मातोश्रीतील धनुष्यबाण चिन्ह काढून टाकण्यात आलं आहे आणि त्या जागी मशाल चिन्ह लावण्यात आलं आहे.