मुंबई – औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाने याचे श्रेय स्वःताह घेत भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आता तरी `संभाजीनगर`, म्हणणार का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात रंगला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीपुर्वी अब्दुल सत्तार शिवसेनेत दाखल झाले होते. मे १९९८ मध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबादला विरोध करत या शहराचे नाव संभाजीनगर केले होते. तेव्हापासून शिवसेना या शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करत आली आहे.
सत्तार जेव्हा शिवसेनेत दाखल झाले तेव्हा ते शहराचा उल्लेख संभाजीनगर करणार का? असा प्रश्न त्यांना व त्याकाळातील शिवसेनेती नेत्यांना देखील विचारला जायचा. तेव्हा सत्तार यांच्याकडून मला उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली आहे, असे म्हणत संभाजीनगरचा उल्लेख टाळायचे. असे ते म्हणायचे आता पुन्हा एकदा त्यांना शिंदेंनी औरंगाबाद म्हणण्याची परवानगी दिली का असा प्रश्न विचारला जात आहे.