वासराचा मृत्यू, अन्नधान्याची नासाडी; लाखो रुपयांचे नुकसान
खडकवासला : पानशेत विभागातील खानू गावातील राघू काळू ढेबे या शेतकऱ्याचे मध्यरात्रीला घर कोसळले. यात शेतकरी व त्याचे कुटुंब थोडक्यात बचावले. एका वासराचा मृत्यू झाला आहे. तर पाच ते सहा जनावरे घराच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यात जनावरे गंभीर जखमी झाले आहेत. याचबरोबर वर्षभर साठवून ठेवलेले धान्य भिजून चिखल झाले असून त्याची नासाडी झाली आहे.
सर्वत्र सध्या मुसळधार पाऊस पडत असून याचा फटका ग्रामीण भागातील कुडा-मेडीचे घरे असणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे. राघू ढेबे या शेतकऱ्याचे घर कुडा-मेडीचे व छप्पर केंबळाच्या गवताचे आहे. पावसाचा जोर जास्त असल्याने कुडा मेडीवर वसलेले घर कोलमडून जमिनदोस्त झाले. यात शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
ऐन पावसाळ्यात डोक्यावरचे छप्पर गेल्याने ढेबे कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. दरम्यान या प्रकारची माहीती तहसीलदार दिनेश पारगे व पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली असून तहसीलदाऱ्यांनीर आदेश देताच पंचनाम्यासाठी तलाठी घटनास्थळी पोहचले होते.
ही घटना मध्यरात्रीस घडली असून यात शेतकरी सुदैवाने वाचले आहेत. शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून प्रशासनाला माहीती दिली आहे. लवकरात लवकर या शेतकऱ्याला शासनाने मदत करावी.
-संतोष कोकरे, माजी सरपंच खानू
पावसाचे प्रमाण जास्त असल्याने अशा घटना घडत आहे. माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने पीडित शेतकऱ्याला ताबडतोब मदत केली. संबंधित प्रशासनाला कळावले आहे.
-विलास कोकरे, पोलीस पाटील खानू