इस्लामाबाद – पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्ष पाकिस्तानमधील अन्य कोणत्याही पक्षाबरोबर कधीही कोणतीही तडजोड करणार नाही, असे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पीटीआय पक्षाच्या २८ व्या स्थापनादिनामित्त पक्षाच्या सदस्यांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये इम्रान खान यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे.
देशावर सध्या सर्वात वाईट हुकुमशाही लादण्यात आली आहे. या हुकुमशाहीमुळे देशाची अर्थव्यवस्था, सरकारी राज्य, लोकशाही आणि न्यायव्यवस्था नष्ट केली जाते आहे. देशाच्या या अधःपतनाला रोखण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने आपले योगदान द्यायला हवे, असे इम्रान खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
देशाच्या खऱ्या स्वातंत्र्यासाठी आपण हवा तो त्याग करायला तयार आहोत. मात्र आपल्या देशाच्या स्वतंत्र्याबाबत कोणतीही तडजोड करायला तयार नाही, असेही खान यांनी म्हटले आहे. आपल्याला खोट्या आणि काल्पनिक प्रकरणात गोवले गेले असून ९ वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे.
ही ९ वर्षांची किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीची तुरुंगवासाची शिक्षा आपण भोगायला तयार आहोत. मात्रदेशाला गुलामगिरीमध्ये ढकलणाऱ्या पक्षांबरोबर तडजोड करणार नाही, असेही इम्रान खान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
देशाच्या संरक्षणाला प्राधान्य मिळण्यासाठी आपण पोलीस महासंचालक, लष्कर प्रमुखांशी चर्चा करणार असल्याचेही पीटीआयचे नेते शहरयार आफ्रिदी यांनी म्हटले आहे. इम्रान खान पहिल्या दिवसापासून लष्कराच्या संपर्कात आहेत, मात्र त्यांना प्रतिसाद दिला जात नसल्याचेही आफ्रिदी यांनी म्हटले आहे.