मंचर येथे पवारांनी सहकारमंत्री वळसे पाटलांचे नाव न घेता लगावला टोला
मंचर – ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांना जाऊन मिळाले ही भूमिका योग्य नसून ही जनतेची फसवणूक आहे. ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा जनता धडा शिकवेल, असा टोला शरद पवार यांनी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव न घेता लगावा आहे.
जुन्नर येथे आदिवासी बांधवांच्या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर ते पुण्याला जात असताना मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांचे मंचर बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर स्वागत, सत्कार करण्यात आला.
यावेळी शरद पवार गटाचे कार्यकर्ते व वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिरूरचे आमदार अशोक पवार, देवदत्त निकम, बाळासाहेब बाणखेले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती वसंत भालेराव, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश भोर, नित्यानंद येवले तसेच बाजार समितीचे संचालक मंडळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, राज्याच्या राजकारणात काही बदल झाले असून सत्ता येथे सत्ता जाते मात्र जे सत्तेला चिटकून राहण्यासाठी वेगळे निर्णय घेतात त्यांना जनता उत्तर देते. जनतेची मते घेऊन निवडून यायचे ज्यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांनाच जाऊन मिळायची ही भूमिका योग्य नसून ही लोकांची फसवणूक आहे.
राज्यात अनेक ठिकाणी अनेकांनी वेगळे निर्णय घेतले आहे; मात्र संधी मिळेल तेव्हा जनता योग्य निर्णय घेईल पुढील वर्ष ते दीड वर्षात संधी मिळणार आहे. त्यावेळी काय करायचे हे मी सांगायची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले.
आंबेगाव तालुक्यात लवकरच जाहीर सभा
आंबेगाव तालुक्यात लवकरच जाहीर सभा घेणार असून त्याबाबत मी व खासदार डॉ. अमोल कोल्हे चर्चा करून तारीख लवकरच देवदत्त निकम यांच्याकडे सांगितली जाईल, असे शरद पवार यांनी नमूद केले.