सोरतापवाडी,(वार्ताहर) – पूर्व हवेलीतील अनेक गावे बागायती असून येथे मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याचे पीक घेतले जाते; परंतु यावर्षी पाणीटंचाईमुळे उन्हाळ्यात जमीन नांगरून जमिनीला विश्रांती देण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जमिनीची मशागत करणे सोपे जाणार असल्याचे मत अनेक शेतकर्यांनी दिले.
पूर्व हवेलीतील गावांमध्ये तीनही हंगामाचे मोठ्या प्रमाणात वर्षभर विविध पिके व भाजीपाल्याची पिके घेतली जातात; परंतु मागील वर्षी पाऊस कमी पडल्यामुळे या वर्षी मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवते आहे. त्यामुळे शेतकर्यांनी उन्हाळ्यात जमीनीची नांगरणी करुन जमिनीला विश्रांती दिली आहे.
जमीन नांगरणी केल्यामुळे जमीन तापली की तणांचे बी जळून जाते. त्यामुळे पुढील पीके घेताना तणांचा बर्यापैकी बंदोबस्त होतो. तसेच जमिनीची उलथापालथ झाल्यामुळे जीवाणूंची संख्या वाढते. त्यामुळे पिकांना बळ मिळते. उन्हाळी नांगरणीमुळे जमिनीची सुपीकता वाढून जमीन भुसभुशीत होते.
त्यामुळे मातीच्या कणांची रचना बदलल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. त्यामुळे पीक जोमदार येते तसेच खरीप हंगामाच्या तयारीसाठी जमिनीला विश्रांती देणे गरजेचे आहे. शेतकरी उन्हाळी नांगरणीनंतर शेणखत जमिनीत टाकत आहेत.
तसेच सतत भाजीपाला केल्याने जमिनीचा पोत खराब होऊन उत्पादन क्षमता घडत आहे. त्यामुळे रासायनिक खतांची जास्त मात्रा पिकांना द्यावी लागते. वारंवार कीटकनाशकांची फवारणी करावी लागते; परंतु जमीन तापल्यामुळे जीवाणूंची संख्या वाढून खतांची मात्रा कमी लागते. कीटकनाशकांच्या फवारणीचा खर्च कमी होऊन पीक जोमदार येते.
जमिनीला उन्हाळ्यात नांगरणी करून तापवणे व विश्रांती देणे खूपच गरजेचे आहे. उन्हाळ्यात जमिनीची मशागत करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या खर्चात बचत होऊन उत्पादन वाढल्यामुळे त्याचा फायदा शेतकर्यांना होतो. -भाऊसाहेब चौधरी, प्रगतशील शेतकरी सोरतापवाडी