Marathwada | Vidarbha | Monsoon | Farmer – राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. राज्यात गेल्या आठवड्याभरात विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. विदर्भासह मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे.
यामुळे अनेक ठिकाणी आंबा, पपई बागांचे नुकसान झाले आहे. बीडसह वर्धा, जळगाव आणि अमरातवी जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
बीड जिल्ह्यात मागील आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी शेतकऱ्यांना या पावसाचा सामना करावा लागत आहे. आधीच अडचणीत असणारे शेतकरी आता अवकाळीच्या संकटाला सामोरे जात आहेत.
आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने फळबागेसह पशुधन मृत्युमुखी पडले आहेत. सांगवी पाटण या ठिकाणी शेख दगडू यांच्या पोल्ट्री फार्ममधील 500 कोंबड्या मरण पावल्या आहेत.
नाशिक शहरासह उपनगरांमध्ये पहाटे अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी हलक्या, तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिकमध्ये २.५ मि.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.
जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्येही अवकाळी पाऊस पडला आहे. एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची हजेरी नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडला आहे. यामुळे गहू, संत्रा आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
थुगाव आणि पिपरी या गावांमध्ये गारपीटामुळे संत्रा, गहू आणि कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने या नुकसानग्रस्त परिस्थितीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.