जाधववाडी – चिखली-मोशी शीव रस्त्याच्या पदपथावर सकाळी व सायंकाळी भाजी व फळविक्रेते आपली दुकाने थाटून बसत आहेत. अनधिकृतपणे पथपथावर दुकाने थाटली जातात परंतु महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच विक्री करताना व्यावसायिक आपल्या तोंडाला मास्क लावत नाहीत. तर काही विक्रेते तोंडाच्या हनुवटीवर मास्क लावत असल्याने ग्राहकांना व नागरिकांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाला आहे. तर बहुतांश ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही.
शहरातील बहुतांश भाजीमंडईमध्ये विक्रेते भाजीविक्री करण्यात एवढे व्यग्र असतात की आपण तोंडाला मास्क लावले आहे की नाही याचे देखील त्यांना भान राहत नाही. सायंकाळी तर पदपथावर भाजी विक्री करणारे विक्रेते ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडत असतात. त्याचा त्रास इतरांना होत असेल याचे भान देखील त्यांच्या ठिकाणी नसते.
काही जण ते केवळ नावाला आपल्या तोंडाला मास्क आहे मग तो तोंड, नाक झाकत आहे की नुसताच लावलेला आहे. याचे तारतम्य त्यांच्या ठिकाणी पाहण्यास मिळत नाही. जणू काही करोनाचा विसर पडल्यासारखे बिनधास्त विक्रेते व नागरिक, ग्राहक वावरताना दिसून येत आहेत. त्यामुळे शहरातील करोना रुग्णांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक भान जपणे गरजेचे आहे.
कारवाई थंडावली
महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन मास्क नसणाऱ्यांवर व गर्दी करणाऱ्यांवर कडक कारवाई करत होते. परंतु आता प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिक व विक्रेते यांना कोणाचाच धाक राहिला नाही. त्यामुळे सर्वजण करोनाचा विसर पडल्यासारखे बिनधास्तपणे वावरत आहेत. प्रशासनाने कारवाई पुन्हा कडक करणे गरजेची आहे.
लहान मुलांना घेऊन येतात खरेदीला
बऱ्याच कुटुंबामध्ये लहान मुलांना सांभाळण्यासाठी घरात कोणीच नसल्याने महिला वर्ग भाजीला येताना आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन येताना दिसतात. त्यांच्या तोंडाला मास्कदेखील नसतो. त्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. करोना पूर्णतः शहरातून हद्दपार झाला नाही. आजही काळजी घेण्याची गरज असताना असा हलगर्जीपणा तसेच अतिउत्साहीपणा धोकादायक ठरू शकतो. हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे.