अध्यक्ष, उपाध्यक्षांनंतर आता उपसरपंचांची देखील मनधरणी
शिक्रापूर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ व बदल होत असताना पक्षांमध्ये देखील अनेक बदल घडत असताना पक्षांच्या पदाधिकार्यांमध्ये सुद्धा अनेक बदल घडून पक्षांच्या पदाधिकार्यांच्या निवडीमध्ये बदल होत आहेत. सध्या शिरूर तालुक्यात वेगवेगळ्या पदांचा मोठा बाजार सुरू होऊन त्यामध्ये उपसरपंचांची सुद्धा भर पडली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळे पक्ष तसेच संघटना कार्यरत असताना प्रत्येक पक्षाने त्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस नेमलेले आहेत; मात्र मागील काही दिवसात शिवसेना पक्षात दोन गट निर्माण होऊन त्यातील वाद मिटलेला नसताना अचानक राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले.
दरम्यान, राज्याला प्रथमच दोन उपमुख्यमंत्री मिळाले यावेळी सरकारच्या वतीने दोन उपमुख्यमंत्री असल्यास कामे गतिमान होतील असे जाहीर केले होते; मात्र त्यांनतर शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन गट कायम राहून प्रत्येक गटाने पक्षावर आपला दावा करत आपापल्या मर्जीतील लोकांना वेगवेगळी पदे देऊ केल्यानंतर जिल्ह्यानंतर तालुक्यात वेगवेगळी पदे वाटली जाऊ लागली,
तर तालुकास्तरीय पदे वाटप होत असताना चक्क गावागावांत पदे वाटप होऊ लागल्याने एकाच गावातून एका एका पक्षाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सरचिटणीस यांसह वेगवेगळ्या सेलची पदे वाटप करत पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना आपलेसे करत त्यांची मनधरणी केल्याने घर तिथे पदाधिकारी,
अशी स्थिती निर्माण होऊ लागली तर गावामध्ये पदाधिकार्यांचे शुभेच्छा फलक झळकू लागल्याने नागरिक संभ्रमात पडू लागले, इतकेच नव्हे तर काही संघटना निर्माण होऊन त्या संघटनांचे देखील पदे वाटप सुरू झाल्याने त्यांची सुद्धा संख्या वाढली आहे, तर सध्या शिरूर तालुक्यात पदांचा बाजार सुरू आहे.
दोन उपसरपंचांची निवड कशी?
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीने दोन उपसरपंच निवडी करत अनेकांना पेचात पाडले; मात्र यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांच्या उपसरपंच पदासाठी भुवया उंचावल्या जाऊ लागल्या, तर दोन उपसरपंच निवड झाली कशी असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
यापूर्वी विविध पदांचा बाजार झालेला असताना आता त्यामध्ये लोकशाही पद्धतीने नेमल्या जाणार्या उपसरपंचपदाचे देखील उडी घेतली आहे. मात्र उपसरपंच निवडी दरम्यान देखील गावातील मुख्य नेत्यांनी ग्रामपंचायत सदस्यांची मनधरणी करत त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
खिरापत कधी थांबणार?
पदांची खिरापत थांबणार कधी ? सध्या सर्व संघटना व पक्षांच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांना पदे वाटप केल्याने कार्यकर्ते कमी व पदाधिकारी जास्त अशी स्थिती निर्माण झाली असताना अशा पदांची खिरापत वाटप थांबणार कधी असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.