पिंपरी – पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, भोसरी या चार ग्रामपंचायतीचे क्षेत्र एकत्र करून 4 मार्च 1970 ला पिंपरी-चिंचवड या नवनगराची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर 1982 साली नगरपालिकेची स्थापना करण्यात आली. अल्पवधीतच मोठ-मोठ्या उद्योगांमुळे कररुपाने मिळणाऱ्या भरघोस उत्पन्नामुळे आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत नगरपालिका म्हणून पिंपरी-चिंचवड नगरपालिकेने नावलौकिक मिळविला. शहरातील वाढते उद्योग, वाढती लोकसंख्या लक्षात घेता 1982 साली महापालिकेची स्थापना झाली. ऑटोमोबाइल हब, उद्योगनगरी, आयटी हब, एज्युकेशन हब करत आता स्पोर्टस हबचेही बिरुद मिळविणाऱ्या या शहराच्या विकासाचा आलेख सातत्याने उंचावत राहिला आहे. या शहराने देशाच्या नकाशावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. “कटिबद्धा जनहिताय” हे ब्रीदवाक्य सार्थ करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आज (बुधवार) 41 वा स्थापना दिवस साजरा होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 7 हजार 127 कोटींचे वार्षिक अंदाजपत्रक असून औद्योगिकनगरी, कामगारनगरी, बेस्ट सिटी, स्मार्ट सिटी अशी वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवडची मेट्रोसिटीकडे यशस्वी घौडदौड सुरू आहे. शहरातील उद्योग, व्यवसायाबरोबरच हिंजवडी आणि आयटी पार्कमुळे शहरात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांचा ओढा वाढला. त्यामुळे शहर चारही बाजूने मोठ्या झपाट्याने वाढत असताना शहराची 30 लाखांच्या घरात लोकसंख्या गेली आहे. शहरातील महापालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या मुलभूत सुविधा, शहरातील प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, उद्याने आदी सुविधा या उच्च दर्जाच्या आहेत. त्यामुळेच आशिया खंडातील सर्वाधिक झपाट्याने वाढणाऱ्या शहरामध्ये पिंपरी-चिंचवडचा वरचा क्रमांक लागतो.
स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक वसाहत विकसित झाली. पिंपरी-चिंचवड या औद्योगिकनगरीचे शिल्पकार म्हणून कै. आण्णासाहेब मगर ओळखले जातात. डॉ. श्री. श्री. घारे हे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष होते. 11 ऑक्टोबर 1982 ला पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना झाली. सुरुवातीला चार वर्ष हरनाम सिंग हे महापालिकेचे पहिले आयुक्त व प्रशासक होते. 1986 च्या निवडणुकीनंतर ज्ञानेश्वर लांडगे यांना पिंपरी-चिंचवडचे पहिले महापौर होण्याचा मान मिळाला. सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, रहाटणी, काळेवाडी, थेरगाव आणि वाकड या गावांचा त्यात समावेश झाला. महापालिकेची 11 सप्टेंबर 1997 मध्ये नव्याने हद्दवाढ झाली. तळवडे, चिखली, मोशी, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, दिघी, बोपखेल, दापोडी, मामुर्डी, किवळे, रावेत, पुनावळे आदी गावे महापालिकेत आली. त्यानंतर ताथवडे, पुनावळे ही गावेही महापालिकेत समाविष्ट झाली. तसेच भविष्यात आणखी सात गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव शासन दरबारी आहे.
पाहिले अनेक चढ-उतार
गाव ते नगर, नगर ते महानगर ते औद्योगिक, कामगारनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराची बेस्ट सिटी, स्मार्ट सिटीतून मेट्रो सिटीकडे वाटचाल सुरू आहे. अनेक उद्योगांना आणि देशभरातील कुशल-अकशुल कामगारांना आपल्यात सामावून घेत लाखो कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाऱ्या या उद्योगनगरीने अनेक चढ-उतार पाहिले आहेत. तेजीत झपाट्याने विकास केला तर जागतिक मंदीच्या झळांमध्ये देखील उद्योगांचे हे शहर तग धरुन उभे राहिले. करोनाच्या भीषण काळात जेव्हा सर्व जग ठप्प झाले होते तेव्हा या शहरातील आयटीयन्स व इतर प्रोफेशनल्स घरातून काम करत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोलाचा हातभार लावत होते. करोनाकाळात झालेल्या प्रचंड नुकसानानंतर देखील उद्योगनगरीतील उद्योजक पुन्हा उभा राहिला आणि पूर्वीपेक्षा अधिक वेगाने सक्रिय झाला. याच उद्योजकांनी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या, देशाच्या अर्थव्यवस्था व निर्यात वाढीत आपले योगदान दिले.
सक्षम वैद्यकीय यंत्रणा
करोनाकाळात महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने केवळ आपल्या शहरातील नागरिकांचीच नव्हे तर आसपासच्या ग्रामीण भागातील हजारो रुग्णांचे प्राण वाचविले. आजही महापालिकेची रुग्णालये, दवाखाने आपली सक्षम वैद्यकीय यंत्रणा, तज्ज्ञ डॉक्टर व कर्मशील स्टाफच्या जोरावर रोज हजारो रुग्णांना बरे करत आहेत.
शिक्षण व खेळ
केवळ रोजगारच नव्हे तर रोजगार मिळविण्यासाठी आवश्यक शिक्षणही शहर देत आहे. शहरात अनेक महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आहेत ज्या डॉक्टर, इंजीनियर, सायन्टिस्ट तयार करुन देशाच्या विकासात मोलाचा हातभार लावत आहेत. या शहराने खेळावरही लक्ष दिले असून देशाला व राज्याला पदके मिळवून देणारे खेळाडू देखील तयार करत आहे. आशियाई स्पर्धांमध्ये क्रिकेटमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या टीमचा कॅप्टन देखील याच शहराने तयार केला आहे.