पिंपरी – अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या राज्यव्यापी संपामुळे हजारो बालके आणि स्तनदा मातांना पोषण आहाराला मुकावे लागत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील ३६१ अंगणवाडी केंद्रापैकी केवळ ६ अंगणवाड्या सुरू असून त्यामुळे तीव्र व अतितीव्र कुपोषित बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास आयुक्तालयाकडून अंगणवाडी केंद्रात पूर्व प्राथमिक शिक्षण आणि गरम व ताजा पोषक आहार दिला जातो. मात्र, अंगणवाडी सेविका ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर असल्याने अंगणवाड्यांना नियमित पोषण आहार मिळालेला नाही. शहरात ३६१ पेक्षा अधिक अंगणवाड्या असून यामध्ये सुमारे २० हजार बालके आहेत. ही बालके प्रामुख्याने गरीब घरातील आहेत. संप काळात या बालकांना पोषण आहार पुरविण्याबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे हाल सुरू आहेत. दररोजच्या वेळापत्रकानुसार लापशी, खिचडी, उसळ, वरण-भात, पुलाव आणि उपीट असा गरम व ताजा आहार दिला जातो. मात्र, सध्याच्या संपामुळे झोपडपट्टी भागातील बालकांचे अधिक हाल सुरू आहेत.
कुपोषित बालकांना मिळेना पौष्टिक आहार
शहर परिसरात विविध कामांसाठी जी गरीब कुटुंबे स्थायिक झालेली आहेत; त्या कुटुंबातील लहान बालकेही अंगणवाड्यांमध्ये जातात. दुसरीकडे गरोदर माता, स्तनदा माता व तीन वर्षांच्या आतील कुपोषित बालकांना मिळत असलेला घरपोच पौष्टिक (टीएचआर) आहारदेखील बंद झालेला आहे. गरोदरपणात माता व जन्मानंतर पहिली दोन वर्षे बालकांच्या आहाराच्यादृष्टीने अधिक संवेदनशील असतात. तसेच कुपोषणही वाढू शकते.
बालचमू अंगणवाडी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत
३ ते ६ वयोगटातील बालकांना नियमित पोषक आहारसोबतच अक्षर ओळख, मनोरंजनात्मक गीते, व्यायाम यांचा परिपाठ करून बालमनावर संस्काराचे धडे गिरविण्याचे काम अंगणवाडी केंद्रांमधून केले जाते. सेविका आणि मदतनीस बेमुदत संपावर गेल्याने अंगणवाड्या बंद आहे. त्यामुळे अंगणवाडी कधी सुरू होणार या प्रतिक्षेत बालचमू असल्याचे जाणवत आहे.
राज्यव्यापी संपात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सहभागी झाल्याने लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. सध्या मोजक्या अंगणवाड्या वगळता आहार बनविणे बंद असून काही अंगणवाड्यात मदतनीसांच्या मार्फत आहार पाहचवला जात आहे.
– प्रशांत राऊत, कनिष्ठ सहाय्यक, अंगणवाडी प्रकल्प
अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या राज्यातील एकुण सात संघटनांची कृती समिती तयारप करण्यात आली असून सरकारशी बोलणे सुरू आहे. मात्र, सरकार या संपाकडे गांर्भीयाने पाहत नाही. सावित्रीबाई फुले जयंतीदिनी मुंबईत विराट मोर्चा निघणार आहे.
– एम. ए. पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ