कोरेगाव – धोम डावा कालवा सातत्याने फुटत असून त्यास जलसंपदा विभागाचे अभियंते, कालवा निरीक्षक जबाबदार आहेत. त्यांनी तात्काळ दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अन्यथा कोरेगाव तालुक्यातील जलसंपदा विभागाची सर्व कार्यालयांना शुक्रवार दि. २२ डिसेंबर रोजी टाळे ठोक आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे तालुकाप्रमुख सागर संभाजी बर्गे यांनी दिला आहे. या संदर्भात बर्गे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत प्रांताधिकारी अभिजीत नाईक, तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार उदयसिंग कदम यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, वाई तालुक्यात धोम धरणाची उभारणी व्हावी, यासाठी सर्वात मोठा त्याग कोरेगाव तालुक्याने केला आहे. धोम धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपल्या जमिनी उदार मनाने याच तालुक्याने दिल्या आहेत. धोम धरणाच्या पाण्यावर कोरेगाव तालुक्याचा सर्वाधिक हक्क आहे. धोम डावा कालवा सातत्याने फुटत असून, त्याचा सर्वाधिक फटका कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांना बसत आहे. जलसंपदा विभागाने त्याकडे म्हणावे असे लक्ष दिले नाही. धोम धरणाचा डावा कालवा वाई तालुक्यातील पांडे गावच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्री फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला अक्षरश: पुराचे स्वरूप आले होते.
जलसंपदा विभागाने कालव्याचे पाणी बंद केले असून, कोरेगाव तालुक्यातील पिके आता पाण्याअभावी जळून जाण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली. जलसंपदा विभागाचे अभियंते व कालवा निरीक्षक नेमके काय काम करतात, असा जळजळीत सवाल संतप्त शेतकरी सतत उपस्थित करत आहेत. संपूर्ण राज्यात जलसंपदा विभागाचे अनेक मोठमोठे प्रकल्प असून, त्याचे कालवे आहेत, मात्र धोम धरणाचे कालवे नेमके दरवर्षी कसे काय फुटतात, असा आमचा सवाल आहे, असेही बर्गे यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाकडे प्रचंड मनुष्यबळ असताना देखील हे प्रकार सर्रास घडत असून, सर्वाधिक नुकसान हे शेतकर्यांचे होते,
त्यास अभियंते व कालवा निरीक्षकच जबाबदार आहेत, त्यामुळे त्यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे, त्यांचे कामकाज हे शेतकरी विरोधी असल्याचे दिसून येत आहे. वाई तालुक्यात कालवा फुटीनंतर कोरेगाव तालुक्याकडे येणारे पाणी बंद करण्यात आले असून, दुरुस्तीच्या कामाला तब्बल पंधरा दिवस लागण्याची शक्यता आहे, तदनंतर चाचणी घेऊन जलसंपदा विभाग पाणी सोडणार असल्याचे समजते. कोरेगाव तालुक्यात पाणी पोहचण्यास तब्बल महिना लागणार आहे. तोपर्यंत हाता तोंडाशी आलेली पिके वाळून जाण्याची भीती आहे. यासंदर्भात शेतकरी हितासाठी आम्हाला आता आक्रमक भूमिका घ्यावी लागत आहे. शेतकर्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आंदोलनाची भूमिका घेत आहोत.