कोरेगाव – विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कमर्चाऱ्यांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. कोरेगाव तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींमधील कामकाज ठप्प झाले. शासनाने शंभर टक्के मानधन द्यावे, विमा संरक्षण लागू करावे, या व इतर मागण्या असून सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी १८ डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत संपावर गेले असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालये कुलूपबंद राहिली असून गावगाडा ठप्प झाला आहे.
कोरेगाव तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतीतील कामकाजही संपामुळे ठप्प झाले आहे. संपाच्या मागण्यांच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी दिली.
संपात सरपंच परिषद, ग्रामसेवक युनियन, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ, ग्रामरोजगार सेवक संघटना, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना, ग्राम रोजगार सेवक संघ, राज्य ग्रामपंचायत व जिल्हा परिषद कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत राज्य शासनाकडे नेहमी पाठपुरावा करूनही मागण्या मान्य न झाल्याने ग्रामसेवकांनी संप पुकारला आहे, अशी माहिती कोरेगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष निलेश नेताजी बर्गे यांनी दिली.