सांगवी, दि. 17 (वार्ताहर) – पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकात महापालिकेचे कै. बट्टूराव (आप्पा) गेनूजी जगताप क्रीडा संकुल असलेले उद्यान सुरक्षारक्षकाविना बेभरोसे बनले आहे. सुरक्षारक्षकच नसल्याने दिवस मावळला की, अंधारात मद्यपी उद्यानाच्या प्रवेशद्वारातच बसतात. त्यामुळे उद्यानात मद्याच्या बाटल्यांचा खच सर्वत्र पाहायला मिळत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
महापालिकेने 2 कोटी 79 लाख रुपये खर्च करून क्रीडा संकुल उद्यान तयार केले आहे. मात्र, महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची दुरवस्था होत आहे. येथील उद्यानात सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचारी नाही. त्यामुळे मद्यपींचा मोठ्या संख्येने मुक्त वावर आहे. उद्यानात प्रवेश करताच उजव्या बाजूला मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, ग्लास आदी खाद्यपदार्थांचा कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. तर उद्यानात येताच मद्यपी तेथेच झोपलेल्या अवस्थेत पहावयास मिळत आहे. त्याठिकाणी कपडे, पिशव्या, आंथरूण पांघरूण, चटई आदी साहित्य असल्याचे पहावयास मिळत आहे.
लाखो रुपये खर्च करून विकसित केलेले क्रीडा संकुल उद्यान नागरिकांसाठी आहे, की मद्यपींसाठी ? उद्यानात फेर फटका मारल्यास तिथेही आजूबाजूला झाडाझुडपांमध्ये मद्याच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक कचरा सर्वत्र आढळून येत आहेत. याकडे महापालिका अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने नागरिकही उद्यानाकडे पाठ फिरवीत आहेत. उद्यानात मोठ्या प्रमाणात गवत, झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.
देखभालीअभावी उद्यानाची दूरवस्था
उद्यानातील विजेच्या खांबांचे जोड असलेले बॉक्स टवाळखोरांनी तोडले आहेत. त्यामुळे जोड असलेल्या वायरी उघड्यावर पडलेल्या आहेत. हे धोकादायक आहे. चालण्याच्या ट्रॅकवर पालापाचोळा, प्लास्टिक कचरा पडलेला आहे. वेळोवेळी स्वच्छता होत नसल्याने दिवसेंदिवस हे उद्यान भकास होत आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिक, बालचमु, खेळाडू येथील क्रीडा संकुल उद्यानात येण्यास पाठ फिरवीत असल्याचे चित्र आहे.
या उपाययोजना करा
महापालिका व स्थानिक पोलीसांनी याकडे लक्ष द्यावे. उद्यानातील मद्यपींवर आळा बसवावा. उद्यानात कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमावा. उद्यानातील वाढलेली झाडेझुडपे, गवत काढावे.उद्यानाची दररोज स्वच्छता व्हावी.