बॅंकेत जॉइन होऊन जवळजवळ दोन महिने झाले. अलीकडे नोकऱ्या मिळणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे आणि त्यात सरकारी नोकरी म्हणजे दोऱ्याने छताला टांगलेला जिलेबीचा तुकडा. जिलेबी खायचा मोह तर आवरत नाही आणि त्या तुकड्यापर्यंत पोहोचायचं तर उड्या मारता मारता तो तुकडा खायची इच्छा आतल्या आत मरून जाते!
लहानपणापासून हरहुन्नरी असूनही घोळक्याबरोबर चालताचालता माझा साहित्याकडचा ओढा आणि भाषांवरचं प्रेम बाजूला राहिलं आणि आकडेमोड करत मी इंजिनिअर झाले! कॅम्पस इंटरव्ह्यू मधून बऱ्यापैकी नोकरीही मिळत होती. पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. ती नोकरी स्वीकारायला मन राजी नव्हतं! मग तो विचार सोडून दिला आणि आणखी मार्ग शोधू लागले. पण नवं शिकणं-शिकवण्याची ओढ स्वस्थ बसू देईना! आयटी किंवा तत्सम कार्पोरेट लाइफ आपल्याला जगण्याचा आनंद मिळवून देऊ शकत नाहीत हे एव्हाना लक्षात आलं होतं. मग मी जिथं शिकले ते माझंच कॉलेज जॉइन केलं. अधिव्याख्याती म्हणून! तेच तेच विषय नव्यानं-नव्या शैलीनं शिकवायचा प्रयत्न करू लागले. वय तर कॉलेजमधून शिकून बाहेर पडण्याचं पण मी मात्र तिथेच रूजत होते… शिकवण्यासाठी!
प्राध्यापकांचा-लेक्चरर्स लोकांचा एक फायदा असतो की त्यांच्या शरीराचं वय वाढत राहतं पण मनातून मात्र ते कॉलेजच जगत राहतात! त्यांचे तरूण विद्यार्थी-विद्यार्थिनी, त्यांचं कॉलेज आणि त्यांचं वय असा एक समांतर प्रवास चालू असतो ज्यात तरूणाईचा उत्साह आणि प्राध्यापकांचं वय कधीच एकमेकांना भिडत नाही.
मधल्या काळात लग्न झालं होतं. नवरा पुण्याला, मी माझ्या नोकरीच्या ठिकाणी आणि सासर-माहेर दोन्ही दोन बाजूला अशी चारस्थळी यात्रा होऊन बसली होती. पण तरीही नोकरी सोडण्याचा धीर होत नव्हता.आयुष्याकडून खूप अपेक्षा होत्या! हातचं सोडायचा धीर कसा होईल? पण मग हळूहळू तिथले लूपहोल्स कळायला लागले. तिथलं भविष्य लक्षात यायला लागलं. फारसा राम वाटेना! नोकरी तर सोडायची होती पण धीर होईना! मग खूप धाडस करून मी ती नोकरी सोडली. आयबीपीएस परीक्षांच्या तयारीसाठी उडी घेतली खरी पण तेव्हा माझ्याकडे वेळ कमी होता आणि दुसरं म्हणजे निवांत जगायची सवय असणारे आम्ही… या महानगरात एका पगारात कसं भागणार ही विवंचना होती. अभ्यास केला आणि शेवटी मनासारख्या आणि नामांकित राष्ट्रीयकृत बॅंकेत मला नोकरी लागली तेव्हाच मी थांबले. हुश्श झालं एकदाचं! आता संघर्ष संपला असं वाटून जॉइनिंग पिरीयड मस्त मजेत घालवला! मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं होतं! मन अगदी पिसासारखं हलकं झालं होतं.आयुष्याची घडी झक्कपैकी बसल्याची स्वप्न पडायला लागली होती.
खात्यात पहिला पगार जमा झाल्याचे भास व्हायला लागले होते.वाळवंटातल्या तहानल्या जीवाला स्वच्छ, गारेगार आणि भरपूर पाणी प्यायला मिळावं तसं गारेगार वाटत होतं मला!बोले तो एकदम कूल! पण हे कधीपर्यंत? जोपर्यंत माझी जॉईनिंग ऑर्डर पुण्यापासून साठ किलोमीटरच्या एका तालुक्याच्या गावी येईपर्यंत!तसं पहायला गेलं तर ते एक मोठं खेडंच! जॉईनिंग ऑर्डरवरचं त्या गावाचं नाव वाचलं तसा आधीचा आनंद निम्म्याहून कमी झाला आणि त्याहून कमी झाला तो त्या शाखेतली गर्दी पाहून! पेन्शनर्सची गर्दी! इंटरनेट बॅंकिंग,कार्ड ट्रान्सॅक्शन्स, मोबाईल बॅंकिंगशी दुरान्वयेही संबंध नसलेले तिथले ग्राहक! लाखांमध्ये रोख नोटांचे व्यवहार आणि बहुतांशी ग्राहक ग्रामीण भागातून येणारे शिवाय अल्पशिक्षित किंवा अगदी अशिक्षित! त्यांना खात्यातली शिल्लक समजावून सांगावी लागते… नंतर पासबुक छापून द्यावं लागतं आणि त्यानंतर पुन्हा त्या पासबुकवर छापलेली प्रत्येक एन्ट्री समजावून सांगावी लागते.
पहिले चार दिवस संध्याकाळी घरी पोचल्यावर कोणाशीही काहीच बोलायची इच्छाच उरायची नाही.शक्तिपात झाल्यासारखं वाटायचं! डोकं भणभणायला लागायचं आणि रात्री झोपेतही आकडेच आकडे डोळ्यांसमोर फिरायचे. सकाळी उठले तरीही असं वाटायचं की गेल्या कित्येक वर्षांत आपण शांत झोपलोच नाहीये! मग पंधरा-वीस दिवसांनी सवय झाली पण तरीही नकोसं वाटायला लागलं ते तसंच! रोजच्या इतक्या प्रवासानं अंग आंबून जायला लागलं. एवढ्या कठीण स्पर्धा परीक्षेतून निवड होऊन आपण हे काय करतोय? शेवटी तिथेच… अशा विचारांनी मन रमेना! उदासीन वाटायला लागलं.
रोजनिशीवर दिवसाचं गणित मांडून पानंच्या पानं भरून टाकणारी मी …ती रोजनिशी लिहिनाशी झाले. त्यात लिहायचं काय? हाच तर मोठा प्रश्न होता. रोजचा दिवस तोच आणि तसाच! पण आता बऱ्यापैकी सवय झालीय! नोकरी प्रत्येकवेळी आपल्याला आवडणारीच असते असं नाही… सारखा आवडायला तो काही छंद नव्हे! आमची आजेसासू म्हणायची… न चा पाढा लक्षात ठेव! नवरा आणि नोकरी सोडता येत नसेल तर जशी असेल तशी सांभाळायची! मग काय? मन रमवण्याचे प्रयत्नही चालूच होते! आहेत!
एक तारखेच्या आसपास शाखेत प्रवेश करायला जागा नसते इतकी गर्दी होऊन जाते तिथे! काही दिवसांपूर्वी आम्ही पोचलो तेव्हा शाखेच्या पायऱ्यांवर ज्येष्ठ नागरिक दाटीवाटीने बसले होते. थकलेले-बापुडवाणे वृद्ध चेहरे घेऊन! प्रत्येक जण थकल्या डोळ्यांनी बॅंकेच्या कर्मचाऱ्यांची वाट बघत होता.कधी एकदा काउंटर चालू होतो आणि आपली पुंजी आपल्या हातात पडते असं झालं होतं त्यांना! नेहमीच असं चित्र असतं!दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भविष्यातल्या स्वतःच्या म्हातारपणाची नव्यानं भीती वाटू लागते! बरेचसे वृद्ध लोक लाचारच दिसतात! नसले तरीही! त्यातल्या कोणाची पेन्शन हजार, कोणाची दोन हजार, क्वचित कोणाची साडेतीन-चार हजार आणि एखाद्याची पाचशे पण! माणूस म्हातारा झाला तरी गरजा म्हाताऱ्या होत नाहीत उलट त्या अधिक तरूण आणि शक्तिमान व्हायला लागतात हेच खरं!
त्या दिवशी एक माणूस मॅनेजर साहेबांच्यामागे मागेच शाखेत आला. त्यांच्या पाया पडायला लागला. मला फक्त पन्नासच रुपये पायजेल हेत. पयले मला देवा. माजी लेक निगाली माघारी सासारला! पुन्यांदी कवा भेटायची ठावं न्हाई रं म्हाराजा. वटी भरायची हाय म्हायारवासनीची! एक डाव मला आदुगर लंबर दे! काउंटर चालू व्हायला अजून पंधरा मिनिटे बाकी होती. कॅश ओपनिंग चालू होतं. नियमाप्रामाणं कुठलाही ग्राहक या काळात शाखेत यायला नको होता. पण या आजोबांचं बघून बाकीचे लोकही मग शटरमधून आत आत घुसायला लागले. शिपाई नेहमीप्रमाणे लोकांना विनंती करून बाहेर थांबवू लागले. मॅनेजरांचा आणि त्या आजोबांचा संवाद चालूच होता. उत्सुकता म्हणून मी त्याचं पासबुक मागितलं आपले दुखरे पाय ओढत ते माझ्याजवळ आले …लगबगीनं! मी त्यांच्या अकाउंटची शिल्लक पाहिली तर शिल्लक फक्त तीन रूपये तेवीस पैसे!
क्षणभर मीही हळवी झाले. त्याचं पैसे काढण्याचं कारण ऐकून… शेवटी मीही आता एका गुडघे दुखणाऱ्या- केस पिकल्या म्हाताऱ्या बापाची पोर होते! काय करावं…. सांगावी का त्यांना त्यांच्या खात्यातली शिल्लक? …नाही! नको! हिरमोड होईल बिचाऱ्या बाबांचा. मग नकळत मी बोलून गेले… बाबा… कुठे आता पन्नास रूपयांसाठी लाइनला उभे राहता! बाकीचे तुमचे दोस्त परत वादावादी करतात! तुम्ही एक काम करा… मीच देते तुम्हाला पैसे. आता घाई आहे ना तुम्हाला! पावती भरावी लागेल! अधिकाऱ्यांसमोर अंगठा उठवावा लागेल… वेळ जाईल तुमचा. त्यापेक्षा आत्ता देते मी पन्नास रुपये! बघू आपण नंतर!
असं म्हनता… द्येवा द्येवा! मी बुडिवनार न्हाई तुमचं पैसं! लोककलावंत म्हनुन पेन्शिन मिळती मला हितं! आनि कलावंत कदी खोटा निघत न्हाई! मी म्होरं कवातरी यीनच की… तवा द्येतो! मी दिलेली ती पन्नासाची नोट नीट घडी करून त्यांनी आपल्या जुनाट कोपरीच्या खिशात ठेवली आणि आधार घेत घेत ते आजोबा शाखेबाहेर पडले.
तेवढ्यात आमचा संवाद ऐकणारे आमचे मॅनेजर पुढे आले. माणुसकी म्हणून ठीक आहे पण एक बॅंकर म्हणून तुझा आजचा व्यवहार चुकला! या नोकरीचे काही नीतीनियम असतात. प्रोटोकॉल्स म्हण हवं तर! कुठल्याही ग्राहकांशी वैयक्तिक आर्थिक व्यवहार करायचे नाहीत. माणुसकी म्हणूनही! आणि पन्नास रुपये असोत किंवा पन्नास पैसे! व्यवहार आणि चूक तेवढीच मोठी असते! आज ठीक आहे! परत असं करू नको! त्यांचे डोळे माझ्यावर आग ओकत होते. मी घाबरून गेले खरी!
त्यांचे बोलणं मला पटलं. त्यांनी कारणमीमांसाही सांगितली. मी अजूनच केविलवाणी झाले. चुका माणसाचं सुख खाऊन टाकतात. या चुकीनं मला मी दाखवलेल्या यत्किंचित माणुसकीचं सुखही लागू दिलं नाही. दिवसभर मॅनेजरसमोर जायची भीती वाटायला लागली. हुरहुर-काहुरीनं दडपण आलं.
तेव्हा परत या नोकरीबद्दल निगेटीव्हीटी आली. कुठून दुर्बुद्धी सुचली ही नोकरी धरली, या गावात आले आणि वर या माणसाला पैसे दिले असं झालं मला. मॅनेजरच्या बोलण्यानं खूप अपमान वाटला. पण आता परतीचा मार्ग नव्हता. मी मान खाली घालून गप्प ऐकून घेतलंच होतं. दिवसभर मान खाली घालून बसले होते. घरी पोचले तरी डोक्यातून ते शब्द जाता जाईनात. तो प्रसंग एक दोन दिवसांनंतर विसरून गेले होते मी. जाणीवपूर्वक!
आज पुन्हा एक तारीख! पेन्शनची ही मोठी रांग! प्रत्येकाला आपल्या कामाची घाई, वादावादी, गर्दी आणि गरमीचा त्रास! काहीशा त्रासलेल्या मनस्थितीतही चेहऱ्यावर हसू ठेवून आम्ही कामाला सुरुवात केली. इतक्यात रांगेतून किंचित थकल्या-वृद्ध आवाजात एक भारदस्त कवन ऐकू येऊ लागलं! लोक माना वाकड्या करकरून आवाज कुठून येतोय ते पाहू लागले. एखाद्या महानगरात फ्लॅश मॉब चालू व्हावा आणि प्रेक्षक जमू लागावेत तसं झालं शाखेत! जो तो टाचा उंचावून पाहू लागला. मोबाइल शूट होऊ लागलं! जास्तीत जास्त लोकांनी त्या गाणाऱ्या माणसाभोवती कोंडाळं केलं. आमच्या शाखेचे शिपाई लोकांना शांत करू लागले. जशी शांतता पसरली तसे गाण्याचे बोल कानावर पडू लागले. “गरीबा-गुरीबाची देतीया साथ करतीया मदत, चांगली तिची नियत, ही आमची ब्यांकवाली ताई’
आता मला कळून चुकलं की रांगेत उभं राहून गाणारे ते तेच आजोबा होते ज्यांना मी परवाच पैसे दिले होते.
पन्नास रूपये! लोककलावंत होते ते! शीघ्र पोवाडा सादर केला त्यांनी! माझ्याकडे बोट करून गात होते! त्यांनी गाण्यातून आभार मानले माझे! मला काही सुचेनासं झालं. हे कौतुक झेलावं कसं? पुढे अजून काही ओळी होत्या. त्या संपल्या तशा रांगेतल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आमच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर कौतुक दिसत होतं.अगदी मॅनेजरही मधेच चऊवर टाकून गाणं ऐकून गेले. मग सगळं आलबेल झालं. पुन्हा रांग सरकू लागली. आजोबांनी त्यांचे पैसे काढले. डिनॉमिनेशन मध्ये पन्नासाच्या दहा नोटा! पेन्शनच होती पाचशे रूपये! जाता जाता आजोबा पुन्हा माझ्याकडे आले. थकलेले पाय ओढत! मी आधी मॅनेजर केबिनकडे पाहून घेतलं. ते काहीतरी कामात अगदी व्यस्त होते. मी निःश्वास टाकला. ते आजोबा माझ्यासमोरच्या खुर्चीवर बसले.कोपरीच्या खिशातून पन्नासची नोट काढली आणि खांद्याच्या मळकट कापडी पिशवीतून केळीचा घड!
“ह्ये तुझ्ये पन्नास रूपय! अन् ह्यो क्येळीचा फना! माज्या लेकीवानी तुजी बी वटी भरली समज! क्येळ कशी कुटंबी उगवती… अशी जिमीन-तसं पानी असलं नेम केळीला न्हाईत! जितं जाईल तितं फुलणार… गोड ऱ्हानार! तशी तू बी ऱ्हा! सगळ्यांसंगं गोड बोल! म्हनुन ही केळं बघ! न्हाई म्हनू नको… हे व्याज नव्हं! साज म्हनून घे! आमच्या गावाकडची माया हाये…’ आजोबा टेबलाला धरून उठायला लागले. आतून मॅनेजर माझ्याकडे बघत होते. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल कौतुक होतं. ते दाखवत नसले तरी! मी खुर्चीवरून उठले.तडक वॉशबेसिनला गेले. चेहऱ्यावर-डोळ्यांवर भरपूर पाणी मारलं आणि पुन्हा जागेवर येऊन बसले. माझ्या डोळ्यात माझ्या नोकरी बद्दल, माझ्या बॅंकेबद्दल आणि त्या आजोबांबद्दल कृतज्ञतेचं पाणी होतं. मी दाखवत नसले तरी! अजूनही कुठेकुठे कृतज्ञतेची भावना जिवंत आहे, याचं खूप कौतुक वाटलं!
आता उद्या बॅंकेत जायला हुरूप आलाय! काहीतरी छान घडू लागलंय! धन्यवाद पोवाडावाले मोठ्या मनाचे बाबा. माझ्या नोकरीवर प्रेम करायची आणि रोज नवा हुरूप घेऊन बॅंकेत जायची प्रेरणा दिल्याबद्दल!
– प्रज्ञा जोशी-कुलकर्णी