मुंबई : पंजाबमधील राजकीय गोंधळाचे पडसाद संपूर्ण देशातील राजकारणावर पडताना दिसत आहेत. कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा, चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी, नवजोत सिंग सिद्धू यांचा राजीनामा अशा एकामागोाग एक घटना घडल्या. त्यातच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले.
शिवसेनेने अमित शाह आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या भेटीवर निशाणा साधतानाच काँग्रेसलाही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून या सर्व वादावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
वारंवार दिल्ली वारी करणाऱ्या राज्यातील विरोधकांना शिवसेनेने यात टोला लगावला आहे. “काँग्रेसचे जे व्हायचे किंवा करायचे ते त्यांचे नेतृत्व करील. पण गिधाडे फडफडावीत तसे काँग्रेसच्या अस्तित्वावर घिरट्या मारण्याचे उद्योग सुरू आहेत. पंजाबमध्ये जे घडलं, ते पश्चिम बंगाल, महाराष्ट्राच्या बाबतीतही घडवण्याचा प्रयत्न होतच असतो. प. बंगालमध्ये अनेकदा सरकारला डावलून विरोधी पक्षाला केंद्राचे लोक चर्चेला बोलावतात. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे लोक ऊठसूट दिल्लीस जातात. जणू विरोधकांचं नित्यनेमाने दिल्लीत डोहाळे जेवणच असतं”, असे शिवसेनेने म्हटले आहे.
इतर पक्षांमधील नेतेमंडळी, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेण्याच्या वृत्तीवर देखील सामनाच्या अग्रलेखात बोट ठेवलं आहे. “नाराजी सर्वच पक्षांत असते, फक्त वरचे नेतृत्व किती प्रबळ आहे, यावर पळवापळवीचे माप ठरलेले असते. इंदिरा गांधींसारखे नेतृत्व असते, तर कॅ. अमरिंदर सिंग यांची असे काही करण्याची हिंमत झालीच नसती”, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
दरम्यान, नवजोतसिंग सिद्धू यांच्याबाबत देखील अग्रलेखातून राहुल गांधींना सल्ला देण्यात आला आहे. “वर्षानुवर्षे पदं भोगून सत्तेचा मलिदा खाऊन ढेकर देणाऱ्या म्हातार मंडळाने जी-२३ नावाचा गट स्थापन केला. राहुल गांधींनी जसे या म्हातार मंडळाच्या झांशात येऊ नये, तसे नवजोत सिंग सिद्धूसारख्या येडबंबूच्या नादालाही लागू नये.
काँग्रेस पक्षात जुने भरवशाचे लोक म्हातारचळ लागल्याप्रमाणे वागत आहेत, तर सिद्धूसारख्या लोकांचे चित्त ठिकाणावर नाही. पंजाबातील काँग्रेसचा उरलासुरला पायाही हे येडबंबू खतम करतील”, असा सल्ला शिवसेनेने अग्रलेखातून दिला आहे.