पुणे – पुण्यनगरी आणि परिसराला ऐतिहासिक घटना आणि क्रांतिकारकांच्या कार्याचा मोठा वारसा लाभला आहे. अशा समृद्ध आणि प्रेरणादायी ठिकाणांचे आणि स्मारकांचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे.
सध्या महापालिकेच्या वतीने आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक आणि आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांची स्मारके, छत्रपती राजाराम महाराज समाधी, भिडे वाडा दुरुस्ती, क्रांतिकारकांच्या जीवनावरील कायमस्वरूपी संग्रहालय, ज्येष्ठ साहित्यिक गदिमा स्मारक इत्यादी कामांचे विकसन, दुरुस्ती, सुधारणा आणि काही स्मारकांची नव्याने उभारणी अशी कामे सुरू आहेत.
1820 ते 1830 या कालखंडात ब्रिटिशांच्या विरोधात लढा देऊन त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्यांमध्ये आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक आघाडीवर होते. फितुरीमुळे इंग्रजांनी त्यांना बेसावध असताना 15 डिसेंबर 1831 रोजी पकडले आणि पुण्यातील मामलेदार कचेरीतील अंधाऱ्या खोलीत 35 दिवस डांबून ठेवले.
पुढे त्यांच्यावर खटला चालवून त्यांना फाशी देण्यात आली. मामलेदार कचेरी परिसरातील उमाजी नाईक यांच्या प्रेरणादायी स्मारकाच्या जागेचे सुशोभीकरण व संवर्धनविषयक कामे करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.
संगमवाडी येथे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक सुमारे 21,000 चौरस फूट जागेवर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. नाना वाड्यातील तळमजल्यावर 10 दालनांमध्ये ऐतिहासिक घटना आणि क्रांतिकारकांच्या जीवनचरित्राचे कायमस्वरूपी संग्रहालय उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
त्यामध्ये क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे, क्रांतिवीर उमाजी नाईक, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, 1857 चा स्वातंत्र्यसंग्राम, आदिवासींनी केलेला उठाव, मवाळवादी गटाचे कार्य, लोकमान्य टिळक, चापेकर बंधू आणि लाल-बाल-पाल आदी समाजसुधारकांची माहिती देण्यात आली आहे.
महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये स्त्रियांसाठी पहिली शाळा जेथे सुरू केली त्या तात्याराव भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली गेली असून, जागा ताब्यात येताच काम सुरू होणार आहे.
ज्येष्ठ साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांचे स्मारक कोथरूड येथील प्रस्तावित भव्य प्रदर्शन केंद्रात उभारण्यात येत असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. किल्ले सिंहगड महापालिकेच्या हद्दीबाहेर असला, तरी ऐतिहासिक प्रेरणास्थळ म्हणून पुणे महापालिकेने सिंहगडावर वारसा जतन करण्याचे आणि सुशोभीकरणाचे विविध उपक्रम हाती घेतले आहेत.
तानाजींच्या समाधीच्या मूळ रचनेला धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने या परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले. आता या परिसरातील दगडी फरसबंदी, ब्रॉंझमधील स्वराज्यनिष्ठ शिल्प आणि दगडी बांधकामातील सीमाभिंत ही कामे पूर्ण झाली आहेत. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. तसेच शिवनेरीवर राजमाता जिजाऊ आणि बालशिवबा यांचे शिल्प उभारण्याच्या खर्चाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे.
पुण्याला लाभलेल्या पराक्रम आणि कर्तृत्वाच्या वारशाचे संवर्धन करण्याचे काम महापालिका करते आहे. जाज्वल्य इतिहासाचे जतन आणि संवर्धन करीत थोर क्रांतिकारकांचे कार्य पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे काम प्रगतिपथावर आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर