मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारही उपस्थित होते. राष्ट्रवादीत एवढा मोठा भूकंप झाल्यानंतरही शरद पवार मोदींसह व्यासपीठार एकत्र आल्याने शरद पवारही भाजपासोबत जाणार असल्याच्या राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु झाल्या. मात्र, या सर्व चर्चांवर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातल्या कार्यक्रमाविषयी बोलताना संचय राऊत यांनी, ‘शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमाविषयी वाद निर्माण झाले आहेत. पण आम्ही त्यावर पडदा टाकू. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा जेव्हा दिल्लीच्या शत्रूंनी रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक केला. हे पवार साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील,’ असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
पुढे बोलताना त्यांनी,”ज्या पद्धतीने पक्ष फोडले, ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण केलं, हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे. जनतेच्या मनात याविषयी रोष आहे. मोदी व्यासपीठावर होते. पण लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या मनातील खदखद कायम आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
हरियाणात हिंसाचाराविषयी बोलताना संजय राऊत यांनी, “निवडणूक आल्यामुळे प्रत्येक राज्यात पेटवा-पेटवी सुरू होईल. प्रत्येक राज्यात अशा दंगलींना सामोरे जावे लागेल. निवडणुका जवळ आल्यावर भाजपाकडून खेळली जाणारी ही जुनी नीती आहे.”असे म्हटले.