Nanded Hospital Death : नांदेडमधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासांत तब्बल २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक बातमी समोर आली आणि पुन्हा एकदा राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मृतांमध्ये ६ मुले आणि ६ मुलींचा समावेश आहे. ही घटना समोर आल्यानंतर शिंदे सरकारवर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे.
नांदेडच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “दुर्घटनेबाबत माहिती घेतली जाईल. त्यावर जे काही उपाय आहेत, ते केले जातील,” असे म्हटले आहे.
तर दुसरीकडे या घटनेबाबत विरोधकांनाही सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, “रूग्णालयाच्या अधिष्ठातांशी चर्चा केली आहे. परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे. वैद्यकीय महाविद्यालय असल्यानं शासनानं तातडीनं कारवाई आणि मदत करण्याची आवश्यकता आहे.”असे म्हटले आहे.
तर “आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत अयशस्वी ठरत आहेत. सावंत यांच्यात हातात महाराष्ट्राच्या आरोग्य दिले, तर ही धोक्याची घंटा आहे. हे मुख्यमंत्र्यांनी समजून घेत फेरबदल करावे,” असे म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंतांना हटवण्याची मागणी केली.
विष्णुपुरी परिसरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात गेल्या २४ तासांत ६ मुले व ६ मुली या १२ बालकांसह सात स्त्रिया आणि पाच पुरुष दगावले आहेत. मृतांमध्ये सर्पदंश, विषप्राशन तसेच अन्य आजारांचेही रुग्ण होते. यातील काही जण परराज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे.