Nanded Hospital Death : – ठाण्यानंतर आता नांदेडमधील रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये 12 बालकांचा देखील समावेश आहे. यावरून आता विरोधकांनी राज्य सरकावर निशाणा साधला आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. रुग्णालयातील या ढिसाळ कारभारावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असल्याचे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरे यांचे ट्वीट –
“नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या 24 तासात 24 मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत. तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय?,” असा सवाल राज ठाकरे यांनी ट्वीटद्वारे केला आहे.
नांदेडमधल्या सरकारी रुग्णलयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय.…
— Raj Thackeray (@RajThackeray) October 3, 2023
पुढे ते म्हणाले की, “सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये, पण महाराष्ट्राचं काय?… दुर्दैव असं की, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे, अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावे.” दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहराच्या महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सक्षम आरोग्यसेवेअभावी 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू होण्याची घटना गंभीर आहे. त्याची चौकशी झालीच पाहिजे. याच रुग्णालयात 70 रुग्ण गंभीर अवस्थेत असून, राज्य सरकारने युद्धपातळीवर निर्णय घेऊन त्या रुग्णांचे प्राण वाचवावे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या रुग्णालयात भेटी दिल्यानंतर सांगितले. या घटनेची दखल घेत राज्यातील आरोग्य संचालकाची एक समिती गठीत करण्यात आली. समितीचे सदस्य चौकशीसाठी मंगळवारी रुग्णालयाला भेट देणार आहेत.