पुणे – विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष नाना पटोले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न विचारता राजीनामा दिला. राजीनामा दिल्यावरच सांगितल. तो राजीनामा द्यायलाच नको होता, असे परखड मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
राजीनामा दिल्यावर लगेचच निवडणूक घेऊन विधानसभा अध्यक्षाची निवड करून तो विषय संपवणे गरजेचे होते. मात्र ते महाविकास आघाडीकडून झाले नाही. त्यावेळेस जर विधानसभा अध्यक्ष असते तर त्यांनीच या 16 आमदारांना अपात्र केले असते, असेही पवार यांनी सांगितले. पुणे येथे एका कार्यक्रमानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पवार पहिल्यांदाच माध्यमांशी बोलले. पवार म्हणाले की, विधानसभा अध्यक्षपद महाविकास आघाडीकडून तातडीने भरले गेले नाही, याबाबत कोणाला दोष देत नाही पण महाविकास आघाडीकडून हे पद भरायला हवे होते. विधानसभा अध्यक्ष असते तर त्यांच्या अधिपत्याखाली या सर्व गोष्टी झाल्या असत्या. या घटना घडल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी पहिल्यांदा बहुमताच्या जोरावर ती जागा भरली.
मी निकाल येण्याआधीच सांगितलं होतं
विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याची मागणी होत आहे, यावर विचारले असता पवार म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांची उंची आत्ताचे भाजपचे नेते गाठू शकत नाही. नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याचा विचार ते स्वप्नातही करू शकत नाही. मी निकाल येण्याआधीच सांगितल होत की, याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे जाईल. तसेच घडले. याचे दूरगामी परिणाम हे देशामध्ये असे प्रसंग निर्माण होईल तिथे दिसतील.