पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील पाणीटंचाई, शेतकरी आत्महत्या यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाही. गेल्या १० वर्षांच्या सत्ता काळात देशातील जनतेसाठी त्यांनी काय-काय केले हे देखील सांगत नाही, कारण सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. त्यामुळे नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा अधिकारच नाही, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेस भवन येथे पुण्यातील पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, रमेश बागवे, सरचिटणीस अजित दरेकर, संजय बालगुडे, वीरेंद्र किराड, कमल व्यवहारे, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, नीता राजपूत, राज अंबिके, प्रशांत सुरसे आदी उपस्थित होते.
नाना पटोले म्हणाले, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणात वेगळेच मुद्दे मांडत आहे. ही निवडणुक लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे. परंतु ते हिंदु विरुद्ध मुस्लीम अशी करण्याचा प्रयत्न करु लागले आहे. चीन आपला भूभाग बळकावित आहे. त्यावर ते काही बोलत नाही. कांदा निर्यातबंदीवर ते बोलत नाही, केवळ गुजरातमधून कांदा निर्यात केला जातो.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जातात, त्यावर ते काही बोलत नाही. एक रुपयाची पीक विमा योजना फसवी ठरली. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत मिळाली नाही असे अनेक मुद्दे आहेत. त्यावर त्यांनी बोलले पाहीजे. केवळ नेहरू-गांधी परिवारावरच ते बोलत आहेत. सोलापुरला त्यांची सभा झाली. पण तेथेही ते दुष्काळ, पाणीटंचाई या विषयावर काहीच बोलले नाही. त्यामुळे मोदी यांना मते मागण्याचा अधिकार नाही.
मोदी यांच्या सभेचा फायदाच
यावेळी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून नाना पटोले म्हणाले, राज्यात मोदींच्या जेवढ्या सभा होतील तेवढा अधिक महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा फायदा होईल. मोदींना नक्कीच सत्तेतून बाहेर काढले जाईल. ही निवडणुक लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी महत्वाची आहे.