सातारा– महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे मत नोंदविले आहे. संवैधानिक पदावर असलेल्या राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ताशेरे ओढले. या निकालानंतर नैतिकता असेल तर शिंदे-फडणवीसांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी दिले होते. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर यांच्यावर निशाणा साधला आहे.
“उद्धव ठाकरेंनी आम्हाला नैतिकता शिकू नये. आम्हांला नैतिकता शिकवण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि मूर्खपणा केला हे आता त्यांनी मान्य केले आहे. आम्हाला आता 2024 पर्यंत वेळ मिळाला आहे.आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ त्यांनी आम्हाला नैतिकतेच्या गप्पा सांगून राजीनामा द्यायला सांगू नये. राजीनामा द्या सांगण्याचा त्यांना काय अधिकार आहे?” असा सवाल नारायण राणे यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “2019 या निवडणुकीपर्यंत हे भाजपबरोबर नांदत होते. भाजपचे मंगळसूत्र घालून त्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या जिंकून आल्यानंतर ते शरद पवारांचा हात धरून गेले आणि हे आता आम्हाला नैतिकता शिकवत आहेत. त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. आता ते राजीनामा देऊन घरात बसले आहे, त्यांनी ते मान्यही केले आहे, मग आता घरातच बसा.” यावेळी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषदेच्या निमित्ताने नारायण राणे काल शुक्रवारी साताऱ्यात आले होते.