बेत्तीयाह – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातल्या अन्य देशांविषयी बरेच काही बोलतात, पण आपल्या देशातील बेरोजगारी विषयी मात्र कोठे चकार शब्दानेही बोलत नाहीत अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी सध्या बिहारच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी येथे आले असून पश्चिम चंपारण जिल्ह्यात आज त्यांच्या प्रचार सभा झाल्या. त्यांनी स्थलांतरीत मजुरांच्या हालकिच्या स्थितीवरून नितीशकुमार यांच्या कारभारावरही यावेळी टीका केली.
वाल्मिकनगर येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची प्रथा आपल्याकडे आहे पण यंदाच्या दसऱ्यात पंजाबात अनेक ठिकाणी रावणाच्या प्रतिमेचे दहन करण्याऐवजी तेथील गावकरी आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे पुतळे जाळले आहेत.
ही घटना महत्वपुर्ण आहे त्यातून लोकांचा या सरकारच्या विरोधातील राग व्यक्त झाला आहे असे ते म्हणाले. पंजाब, बिहार आणि उत्तरप्रदेशातील शेतकरी आणि बेरोजगार युवक आज मोदी सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त करीत आहे. भाजप व एनडीएचे नेते केवळ पोकळ भाषणबाजी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदींनी दरवर्षी देशातील युवकांना दोन कोटी रोजगार देण्याची भाषा केली होती.
पण त्यांचा खोटेपणा आता युवकांच्या लक्षात आला आहे. आता पुन्हा जर मोदी या ठिकाणी प्रचाराला आले आणि त्यांनी रोजगार देण्याची भाषा पुन्हा सुरू केली तर येथील जनता त्यांना प्रचारसभेतूनच हाकलून लावेल असे ते म्हणाले. ते म्हणाले की सरकार कसे चालवायचे हे कॉंग्रेसला बरोबर जमते, आम्हाला शेतकरी व युवकांना कशा प्रकारची मदत करायची हे समजते पण आम्हाला लोकांना खोटे बोलून कसे फसवायचे हे मात्र जमत नाही असे राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केले.
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी सन 2006 मध्ये मंडी सिस्टीम बंद केली. त्यामुळे येथील शेतकरी दलालांच्या हाती गेला. दलालांना हुसकावण्यासाठी ही मंडी सिस्टीम बंद केली पण दलालच शेतकऱ्यांच्या बोकांडी बसला. सन 2006 साली नितीशकुमारांना बिहार मध्ये जे केले तेच मोदी आज देशभर करू इच्छित आहेत असेहीं ते म्हणाले.